मुंबई : समृद्धी महामार्गावर शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 12 जणांनी जीव गमावला. त्याच पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावरील एका बेजबाबदार बसचालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लागू नाहीत अशा भ्रमात…; अनिल परबांची राहुल नार्वेकरांवर बोचरी टीका
समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल चालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ट्रॅव्हलर चालक बेजबाबदारपणे वाहन चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना चीड येत आहे. ट्रॅव्हल बस वेगात असताना चालक स्टेअरिंग समोर मोबाईल ठेवून कानात हेडफोन लावून चित्रपट पाहताना दिसत आहे. नागपूर ते पुणे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल चालकाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
. @HSPMaharashtra समृद्धी महामार्गच नाही तर राज्यात कुठल्याही महामार्गावर बेदरकार वाहनचालकांवर कडक कारवाई व्हायला हवी. समृद्धी महामार्गावर अपघातांची जी मालिका सुरु आहे त्यावरून हे असे चालक किती धोकादायक आहेत ह्याचा अंदाज येतो. तेंव्हा अशा चालकांवर कारवाई करण्यासाठी आणि असं काही… https://t.co/ZqsV2AKE9A
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 17, 2023
त्यावरून मनसेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांची जी मालिका सुरू आहे, त्यावरून हे असे चालक किती धोकादायक आहेत याचा अंदाज येतो. समृद्धी महामार्गच नाही तर, राज्यात कुठल्याही महामार्गावर बेदरकार वाहनचालकांवर कडक कारवाई व्हायला हवी. अशा चालकांवर कारवाई करण्यासाठी आणि असे काही आढळल्यास लोकांना तत्काळ कारवाईसाठी एक विशेष यंत्रणा उभी करावी, असे आवाहन मनसेने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
हेही वाचा – जाहिरातबाजी, टेंडर यातच सगळे मग्न…, वडेट्टीवारांचा खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा
फडणवीसांकडून व्हिडीओची गंभीर दखल
समृद्धी महामार्गावरील व्हायरल होणार व्हिडीओ अतिशय गंभीर आहे. अशाप्रकारे अनेकांचे जीव धोक्यात घालतात त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. या व्हिडीओची गंभीर दखल घेतली जाईल. अशाप्रकारे जे वाहनचालक आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच, जास्तीत जास्त जनजागृती कशी करता येईल, अशाप्रकारचा प्रयत्न देखील करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.