पूरग्रस्त शेतकऱ्यांसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना आज शिंदे-फडणवीस सरकारकडून उत्तर दिले जाणार आहे. त्यामुळे आज सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात अजित पवार यांनी म्हटले की, अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. (Ajit Pawar aggressive on helping flood affected farmers The issue will be raised in the session)
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. या अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आम्ही अधिवेशनात मुद्दा उपस्थित करू, असे म्हटले. तसेच, यावर मुख्यमंत्र्यांची काय भुमिका आहे हे जाणून घेऊ, असेही अजित पवार यांनी म्हटले.
गोगलगायींमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भातही सभागृहात लक्षवेधी मांडली जाणार आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, याबद्दल सर्वांचे एकमत झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभं करायला पाहिजे. आता राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत जाहीर करते, हे पाहावे लागेल, असे अजित पवार यांनी म्हटले.
गेल्या दोन महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके नष्ट झाली आहेत.
हेही वाचा – गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू, सरकारने त्वरित मदत करावी; अजित पवारांची सरकारकडे मागणी