औरंगाबादमध्ये १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेपूर्वी पोलिसांनी औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू केल्याची चर्चा होती. परंतु, या चर्चेला आता औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी पुर्णविराम दिला आहे. ही सर्व चुकीची माहिती असून, असा कोणताही आदेश काढलेला नसल्याचे निखील गुप्ता यांनी स्पष्ट केलं.
“ही चुकीची माहिची आहे. कलम १४४ संबंधी कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांच्या हालचाली, काठ्या, शस्त्रं बाळगणं यावर आम्ही लक्ष ठेवून असतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. वर्षभर असे आदेश काढले जातात. कोणत्याही सभेमुळे किंवा विशिष्ट कारणामुळे हे आदेश काढले जात नाहीत. हा एक नियमित आदेश आहे”, असं निखील गुप्ता यांनी म्हटलं.
दरम्यान, या सभेच्या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रे यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते औरंगाबादला रवाना होणार आहे. त्यांची चर्चा पार पडल्यानंतर १ मे च्या सभेबाबत पुढील निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, औरंगाबादमध्ये जमावबंदी असल्याचे कोणतेही आदेश काढले नसल्याची माहिती पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली आहे. त्यामुळे आता राज ठाकरेच्या सभेला पोलीस परवानगी देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरेंच्या सभेबाबत औरंगाबाद पोलीस निर्णय घेईल – गृहमंत्री
“सर्व पक्षांच्या बैठकीत सर्व चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतरही त्यांना जाहीर सभा घ्यायची असेल तर त्याबाबत काय निर्णय घ्यायचा हा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अधिकार आहे. याबाबत सरकार निर्णय घेणार नाही. औरंगाबाद येथील राज ठाकरे सभेबाबत एक दोन दिवसांत औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतील. ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि पोलीस महासंचालकांसोबत चर्चा करत आहेत. परिस्थिती पाहून त्यासंदर्भातील निर्णय आयुक्त घेतील. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार कारवाई करेल”, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले.
हेही वाचा – मुंबई पोलीस कायद्याच्या बाहेर कोणतेही काम करत नाहीत, वळसे पाटलांचा विरोधकांवर पलटवार