मुंबई : मुख्यमंत्रीपदाच्या काळात आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाची महापूजा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तर, गेल्यावर्षी उपमुख्यमंत्री म्हणून कार्तिकी एकादशीला महापूजेचा मान फडणवीस यांना मिळाला होता. पण यंदा दोन उपमुख्यमंत्री आणि त्यातच मराठा समाजाची नेत्यांना गावबंदी अशी परिस्थिती असताना हा मान कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण आता चित्र स्पष्ट झाले असून पुन्हा एकदा फडणवीस यांच्या हस्तेच विठ्ठलाची महापूजा होणार आहे.
हेही वाचा – ST Bus : दिवाळीत एसटीची विक्रमी कमाई; एका दिवसात 75 वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक उत्पन्न
राज्यात आषाढी यात्रेला श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी यात्रेची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने महापूजेचा मान कोणाला मिळणार, यावर चर्चा सुरू होती. त्यानंतर, विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची चर्चा रंगली होती. पण त्याचबरोबर दुसरीकडे, राज्यात मराठा समाज आरक्षणावरून वातावरण तापले असून मराठा समाजाकडून अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या पूजेला कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित न करण्याचा निर्णय विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतला होता.
Kartiki Ekadashi : पंढरपूरमध्ये ‘इतक्या’ अटींसह मराठा समाजाचे आंदोलन मागे; फडणवीस करणार महापूजा#kartikiekkadashi @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @ShelarAshish @cbawankule @mipravindarekar @mieknathshinde @INCMaharashtra @ShivSenaUBT_ https://t.co/HkZLhUX7FF
— My Mahanagar (@mymahanagar) November 22, 2023
उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजा न करू देण्याचा इशारा देतानाच मराठा समाजाने काही अटी घातल्या होत्या. मात्र, प्रशासनासमवेत सुरू असलेल्या सततच्या चर्चेनंतर मराठा समाजाच्या पाचही अटी मान्य झाल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाने पंढरपूरमधील आपले आंदोलन मागे घेतले असल्यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडणार आहे. याद्वारे सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देत फडणवीस यांनी राज्यातील राजकारणावर आपलाच वरचष्मा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले होते.
हेही वाचा – Bageshwar Baba : तुकाराम महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर बाबांना उपरती; म्हणाले…
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत देखील त्यांनी आपला राजकारणातील प्रभाव दाखवला होता. 2018मध्ये मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला होता. सकल मराठा समाजाने तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना आषाढी एकादशीच्या महापूजेला विरोध केला होता. तेव्हा, आषाढी वारीत साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचे काही लोकांचे प्रयत्न आहेत. तसे मेसेज फिरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दहा लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, असा दावा करतानाच, माझ्या विठ्ठलाची मी घरीच पूजा करेन, असे फडणवीस यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यानुसार ते महापुजेसाठी पंढरपूरला गेले नव्हते.
पण त्याचवेळी तत्कालीन भाजपा सेना युती सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने आरक्षण कायम ठेवतानाच, नोकरीमध्ये 13 तर शिक्षणासाठी 12 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर मराठा समाजाने फडणवीस यांच्या महापूजेला केलेला विरोध मावळला आणि 2019मध्ये फडणवीस यांनाच महापूजेचा मान मिळाला. एवढेच नव्हे तर, पंढरपुरात आषाढी वारीत फडणवीस यांचा सत्कार करण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला होता.
हेही वाचा – फडणवीसांना कोंडून ठेवलंय… राऊतांचा घणाघात; म्हणाले, ही गृहमंत्रालयाची विकृती