भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नाशिक भाजप युवा मोर्चाच्यावतीने पंचवटी कारंजा येथे आंदोलन करण्यात येऊन आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आमदार निलंबन प्रकरणी भाजप कार्यकर्ते आक्रम झालेले पाहायला मिळाले. राज्यात विविध ठिकाणी महाविकास आघाडी सरकारविरोधात निदर्शने करण्यात येत आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेते, मंत्र्यांचे पुतळे जाळण्यात येत आहे. नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाच्यावतीने पंचवटी कारंजा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पुतळा जप्त केला.
महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन जुलूमशाही केली, हुकूमशाही केली आणि 12 आमदारांना निलंबित केले. महाराष्ट्र सरकारने विधीमंडळाचा वापर राजकीय कामांसाठी केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे. जोपर्यंत त्या 12 आमदारांचं निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरु राहील. असा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, सुनील केदार, मनिष बागुल, ऋषिकेश आहेर, निखिलेश गांगुर्डे, संदीप शिरोळे, सुमित नहार, प्रशांत वाघ, प्रवीण भाटे, राम डोबे, विकी पाटील, भुषण शहाणे, विनोद येवले, निलेश चौधरी, हर्षल वाघ, पवन गुरव, विजय बनछोडे आदींसह भाजयुमोचे पदाधिकारी उपस्थित होते. पंचवटी पोलिसांनी अंदोलकंना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.