पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपाच्या झालेल्या दारुण पराभवानंतर पक्षातील अंतर्गत नाराजी आता चव्हाट्यावर आली आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच लक्ष्य केले आहे. ‘बाहेरून आलेल्या पदाधिकाऱ्यांवर विसंबून राहून एकतर्फी विजय होईल, अशा भ्रमात ते राहिले. त्यांनी ही निवडणूक व्यवस्थित हाताळली नाही. त्यामुळंच भाजपचा एवढ्या मोठ्या फरकानं पराभव झाला,’ असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करत राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे कोल्हापूर भाजपामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कोणी केली राजीनाम्याची मागणी?
‘पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचा ज्या पद्धतीने पराभव झाला आहे, तो पक्षातील आणि परिवारातील जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनाला लागला आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील आणि जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे या दोघांवर निवडणुकीची प्रमुख्याने जबाबदारी होती. मात्र, त्यांनी निवडणुकीला फार गांभीर्याने घेतले नाही. तर बाहेरुन आलेल्या पदाधिकाऱ्यांवर अवलंबून राहिले आणि त्यांनी ही निवडणूक व्यवस्थित हाताळली नाही. त्यामुळेच भाजपचा मोठ्या फरकाने पराभव झाला’, असा आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
‘या निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा’, अशी आमची मागणी असल्याचे मत शिवाजी बुवा आणि पी. डी. पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता भाजपचे वरिष्ठ नेते या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करणार का हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचा – माझे कुटुंब, माझी जबाबदारी, माझा पेपर, माझी मुलाखत; मुनगंटीवारांनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली