घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीकास्त्र

उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीकास्त्र

Subscribe

मुंबई : राज्यात 2019 साली झालेल्या निवडणुकीनंतर भाजपाच्या सध्याच्या दिल्लीश्वरांनी बेइमानी केल्याचा आरोप ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आला आहे. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

मी येणारच होतो, पण काही लोकांनी बेइमानी केली म्हणून मध्येच लटकलो, पण तरीही आलो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल, शुक्रवारी म्हटले होते. आता 2019 साली बेइमानी कोणी केली, हे महाराष्ट्र जाणतो. बेइमानी केली ती भाजपाच्या सध्याच्या दिल्लीश्वरांनी. सत्तेचे वाटप समसमान करण्याचा शब्द देऊन तो फिरवण्यात आला व फडणवीस हे त्याचे साक्षीदार आहेत. ही बेइमानी तेव्हा झाली नसती तर, महाराष्ट्रात फडणवीस सन्मानाने पुनः पुन्हा आलेच असते आणि फौजदाराचा जमादारही झाला नसता, हे सत्य ‘प्यारे’ फडणवीस नाकारू शकत नाहीत, अशा शब्दांत ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून शरसंधान केले आहे.

हेही वाचा – …आणि फौजदाराचा जमादारही झाला नसता, ठाकरे गटाचे फडणवीस यांच्यावर शरसंधान

- Advertisement -

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत ठाकरे गटाच्या या टीकेचा समाचार घेतला आहे. किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गरळ ओकली आहे. 2019 साली ज्यांनी भाजपासोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवले, ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेने ओळखले आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – बेइमान आम्ही की तुम्ही? युतीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजपवर साधला निशाणा

उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही म्हणून आजही ते ग्लानीत आहेत. ‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

तुमचा हा जळफळाट फार काळ राहणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या उरल्यासुरल्या अहंकाराची लंका जाळून टाकेल. तोवर जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री- 2मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत टोमणे मारत बसा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -