अंधेरीतील रेल्वे पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वेचे धोकादायक पूल आणि वास्तूंचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. सर्वात गर्दीचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणार्या ठाणे रेल्वे स्थानकातील ब्रिटिशकालीन इमारतीला अनेक ठिकाणी तडे पडल्याची बाब समोर आली असून सततच्या पावसाने इमारतीला पाण्याची गळतीही सुरू आहे. विशेष म्हणजे याच इमारतीत प्रवाशांचे प्रतिक्षालय, रेल्वे अधिकार्यांचे कार्यालय आहेत. दोन नंबर फलाटाला लागून असलेल्या या इमारतीजवळूनच लाखो प्रवाशांचा दररोज वावर होत असतो.
रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
बोरीबंदर ते ठाणे ही देशातील पहिली रेल्वे धावली. त्या घटनेला १६५ वर्षे झाली. आशिया खंडातील हा पहिला रेल्वे प्रवास ठरला होता. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाला वेगळं महत्व आहे. मध्य रेल्वेवरील सर्वात गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाची ओळख आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनला लागून असलेली ब्रिटीशकालीन एक मजली इमारत आहे. या इमारतीला बहुतांशी ठिकाणी तडे पडले असून, प्लास्टरही निघाले आहे. रेल्वेने रंगरंगोटी वरवर केली. मात्र, त्या इमारतीवर आलेली झाडेही तोडण्याची तसदी रेल्वे प्रशासनाने घेतलेली नाही. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्रवाशांसाठी प्रतिक्षालय आहे. तसेच सहा मंडल विद्युत इंजिनिअरींग, स्टेशन डायरेक्टर यांची केबीन आदी कार्यालये आहेत. साधारण दहा ते पंधरा कर्मचारी येथे काम करतात. मात्र इमारत कमकुवत झाल्याने स्लॅबमधून पावसाच्या पाण्याची गळती सुरू आहे. संपूर्ण इमारतीला गळती लागली आहे. त्यामुळे कर्मचार्यांना कार्यालयात बसण्यासही जागा नाही. इमारतीमध्ये साचलेले पाणी महिला कर्मचार्यांना उपसावे लागत आहे.
कमकुवत झालेल्या या इमारतीबाबत प्रशासन गंभीर नाही. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होते.
– नंदकुमार देशमुख, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था, संघटक
रेल्वे संचालकांच्या केबीनमध्ये गळती
ठाणे रेल्वेचे स्टेशन डायरेक्टर सुरेश पी. यांच्याही केबीनमध्ये गळती होत आहे. संपूर्ण कार्यालयात पाणीच पाणी साचत असल्याने बसण्यासाठी जागा नाही.
नंतर बोलेन…
सदर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले का? असे रेल्वेचे संचालक सुरेश पी. यांना विचारले असता त्यांनी मी डीआरएमच्या मिटींगमध्ये आहे. यासंदर्भात माहिती घेऊन तुमच्याशी नंतर बोलेन असे सांगितले.