घरमहाराष्ट्रकठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका

कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका

Subscribe

करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा टप्पा सुरू

जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची कमी नाही. त्यांची दुकाने बंद नाहीत तरी विनाकारण काही लोक बाहेर पडताहेत, पोलीसांशी हुज्जत घालत आहेत. कृपया असे करू नका. घराबाहेर पडू नका, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी थांबवा, सरकारला कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका, असा निर्वाणीचा इशारा रविवारी दिला. रविवारी थेट प्रसारणाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आजपर्यंत राज्यातील सर्व जनतेने संयमाचे अतुलनीय दर्शन घडवले . ते पुढेही काही दिवस कायम ठेवा, घरात राहा, विरंगुळ्याचे, कुटुंबियांसमवेतचे क्षण अनुभवा, असे सांगताना ठाकरे पुढे म्हणाले, राज्याला केंद्र सरकारचे पूर्ण सहकार्य आहे.

पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा, प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते, मंत्रिमंडळातील सहकारी, राज ठाकरे माझ्याशी चर्चा करत आहेत, सर्वजण या प्रश्नावर एकत्र येऊन काम करत आहेत. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड १९ या नावाने स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आल्यानंतर अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. उदय कोटक यांनी १० कोटी रुपयांची मदत केली आहे. कंपन्या, उद्योजक पुढे येत आहेत. कुणी रुग्णालय सेटअप उभे करत आहे तर कुणी मास्क पुरवित आहे. एक चांगली टीम या निमित्ताने तयार झाली आहे, असे ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

इतर राज्यातून आलेले लोक, कामगार घरी जाण्यासाठी परत निघाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर दिसत आहे. त्यांना विनंती आहे की, त्यांनी आहेत तिथेच थांबावे, महाराष्ट्र सरकारने त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. राज्यभर त्यांच्यासाठी १६३ केंद्रे सुरु झाली असून तिथे त्यांची राहण्याची आणि मोफत जेवण्याची सोय केली आहे,अशी माहिती ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्रातील जे लोक इतर राज्यात अडकले असतील त्यांनी तिथेच राहावे. अडचण आल्यास मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करावा. त्यांना संबधीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले. कामगारांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली पाहिजे हे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी जीवनावश्यक वस्तू, औषध दुकाने आणि सेवा बंद केल्या नसल्याचा पुनरुच्चार केला. यासाठी होणारी गर्दी कमी करावी, यंत्रणेवरचा ताण वाढवू नये असे आवाहन ही केले.

राज्यात चाचणी केंद्रे वाढली
राज्यात चाचणी केंद्रे वाढवली आहेत. त्यामुळे करोना पॉझेटिव्हची संख्या वाढेल असा अंदाज आहे. परंतु ही संख्या अपेक्षेपलिकडे जाता कामा नये .बरेच रुग्ण बरे होऊन घरी परत जात आहेत ही समाधानाची बाब आहे. खाजगी डॉक्टरांनीही आपले दवाखाने बंद न करता त्यांच्याकडे येणार्‍या तसेच न्यूमोनियाची लक्षणे असलेल्या रुग्णांना सरकारी दवाखान्यात पाठवावे. कारण लक्षणाची तीव्रता कमी असतांनाच आपण त्यावर विजय मिळवू शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

५ रुपयात शिवभोजन
ही आरोग्याशी संबंधित लढाई असल्याचे सांगून एकत्रित प्रयत्नातून आपल्याला ती जिंकायची आहे. त्यासाठी जबाबदारीने वागायचे आहे. राज्यात शिवभोजन केंद्रात कार्ड असो वा नसो आता पाच रुपयात लोकांना पुढील तीन महिने जेवण देण्यात येणार असल्याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -