भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन, भाषण आणि विचार लवकरच मराठीत डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रे साधने प्रकाशन समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड क्र.६ चे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी बाबासाहेबांचे लेखन, भाषण आणि विचार डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हावे, अशी मागणी केली होती. अजित पवार यांनी हि मागणी मान्य केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या इंग्रजी खंड ६ च्या मराठी अनुवादाचे प्रकाशन झाले. या खंडामध्ये डॉ. आंबेडकरांचे ‘पीएचडी’च्या ‘ब्रिटीश भारतातील प्रांतिक वित्त व्यवस्थेची उत्क्रांती’ आणि ‘डी.एससी.’च्या ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या शोध प्रबंधाचे मराठीत भाषांतर करण्यात आले आहे. pic.twitter.com/fhxVj7N5a2
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 16, 2021
बाबासाहेबांचे लेखन आणि भाषणे मराठीत वाचायला मिळणार असून डिजिटलायझेशनचा मार्गही मोकळा झाला आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी, वाचकांना आणि संविधान मानणाऱ्या सामान्य मराठी माणसाला होणार आहे. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सदस्य सचिव डॉ प्रदीप आगलावे, सदस्य डॉ भालचंद्र मुणगेकर , सहसंचालक शिक्षण डॉ सोनाली रोडे आदी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.
देशाचा, राज्याचा कारभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्य घटनेनुसारच चालला पाहिजे यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आपली सर्वांची आहे. बाबासाहेबांचे मूळ भाषण त्यांची कर्मभूमी जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात अजून मराठीत होऊ शकलेले नाहीत. मागील सरकारच्या काळात एकही खंड प्रकाशित न झाल्याची खंत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली.
डॉ बाबासाहेब यांचे विचार आपली मातृभाषा मराठीत उपलब्ध झाल्यास सामान्य मराठी माणसाला विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी तरुणांना बाबासाहेब समजणे फार सोपे होणार आहे, तसेच त्यांना पीएचडी करण्यास मदत होईल. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तरुण पिढीचा त्यामुळे संवाद घडू शकणार आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार बाजूला ठेवून नको ते विचार आजच्या पिढीपर्यंत काही राजकारणी देशपातळीवर करत आहेत. ते थांबवण्यासाठी आणि हाणून पाडण्यासाठी बाबासाहेबांचा विचार युवकांपर्यंत पोहचवायला हवा. डॉ बाबासाहेब आणि तरुण पिढी यांच्यात संवाद झाला तर भारतीय राज्यघटनाआणि लोकशाही त्यावरील विश्वास वाढायला मदत होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – OBC Reservation : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणे होणार?