लेकीला वाचवण्यासाठी वडिलांनी पाण्यात उडी मारत मुलीला वाचवलं. पण पोहता येत नसल्यामुळे वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापुरात घडली. कोल्हापुरनजीक असलेल्या करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीत ही घटना घडली. सतीश दत्तात्रय गोंधळी (45) असे मृत वडिलांचे नाव आहे. सतीश हे पाण्यात बुडत असताना त्यांच्या पत्नीने आरडाओरड केला. काहीवेळानी सतीश यांना पाण्यातून बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (father drowned while saving daughter in kolhapur)
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील गडमुडशिंगी येथे रविवारी दुपारच्या सुमारास सतीश गोंधळी, पत्नी सिंधू आणि त्यांची मुलगी व शालेय विद्यार्थिनी तृप्ती गोंधळी हे तिघे जण घरातील धुणं धुण्यासाठी गावातील खणीवर गेले होते. त्यावेळी तृप्ती कपडे धुण्यासाठी आईला मदत करत होती. परंतु, त्यावेळी तिचा घसरला आणि तृप्ती पाण्यात पडली. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडू लागली. त्यामुळे वडिलांनी तिला वाचवण्यासाठी तसेच, स्वत:ला पोहता येत नसतानाही पाण्यात उडी मारली आणि मुलीला बाहेर काढले असून, तिचा वडिलांनी बचाव केला. मात्र, त्यानंतर वडिलांचा तोल गेल्याने ते पाण्यात बुडू लागले. पती बुडत असल्याचे पाहताच पत्नी सिंधू यांनी आरडाओरडा केला. मात्र मदतीला कोणी नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून अंत झाला.
सतीश गोंधळी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, भाऊ, भावजय असा परिवार आहे. सतीश यांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे गोंधळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
दरम्यान, रविवारी कोल्हापूरच्या मध्यवर्ती बिंदू चौकात सबजेल रस्त्यावर महापालिकेच्या पाण्याच्या टँकर खाली गेल्याने रेखा अभिनंदन शहा यांचा मृत्यू झाला. रेखा या मुलगा मेहुलच्या मोटरसायकलवरून जात असताना अपघात झाला. बिंदू चौकात रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या वाहनाला शहा यांच्या दुचाकीचा धक्का लागल्याने शहा रस्त्यावर कोसळल्या. त्याचवेळी पाठीमागून आलेला टँकरखाली रेखा आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा – पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर; पोलीस अलर्ट मोडवर तर, ‘या’ गोष्टींवर असणार बंदी