महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. गणपतीची मुर्ती, रंगरंगोटीचे सामान, देखावा, सजावट यांसह अनेक गोष्टी सध्या बाजारात दाखल होताना दिसत आहेत. पण यंदा प्रथमच आपला सर्वांचा लाडका गणपती बाप्पा थेट परदेशात जाणार आहे. तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. (Ganeshotsav 2023 ganpati idol delivering first time in Canada from mumbai by nikhil rajan khatu)
सध्या मुंबईत मोठमोठ्या गणेश मुर्ती बनवण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. एक, दोन फुटांपासून अगदी २५ फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींची निर्मिती कार्यशाळेत केली जात आहे. पण यंदा प्रथमयच कला सागर आर्टस् या कार्यशाळेतून कॅनडामध्ये गणपतीची मूर्ती पाठवली जाणार आहे. ही मूर्ती तब्बल १६ फुटांचीआहे.
चार ते पाच आठवड्यानंतर मूर्ती कॅनडामध्ये दाखल होणार
या मूर्तीचे मूर्तिकार निखिल राजन खातू यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडामधील टोरँटो आणि ब्रैंपटन या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी आम्ही यंदा प्रथमच गणेश मूर्ती पाठवली आहे. एका मोठ्या जहाजातील कंटेनरद्वारे गणपती बाप्पाची मूर्ती कॅनडामध्ये पोहोचणार आहे. त्यासाठी ४ ते ५ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.
विशेष पॅकिंग करून मूर्ती कॅनडाला पाठवली
कॅनडामध्ये पाठवण्यात आलेली १६ फुटांची गणेश मुर्ती ही पूर्णपणे पीओपीने (प्लास्टर ऑफ पॅरिस) बनवलेली आहे. ही मूर्ती परदेशात पाठवण्यासाठी आम्ही खास पद्धतीने पॅकजिंग केले. या गणेश मुर्तीचे पॅकेजिंग इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे करण्यात आले. या मूर्तीच्या पॅकेजिंगसाठी सर्वात आधी लाकडाच्या पट्ट्यांचा वापर करून बॉक्स बनवण्यात आला. त्यात एअर बॅग्ससही लावण्यात आले आहेत. ‘लीलाधर पासो फॉरवर्ड’ या शिपिंग कंपनीच्या माध्यमातून गणपतीची मूर्ती कॅनडाला पाठवण्यात आली. त्यामुळे आम्हाला काहीही काळजी नाही.
मुंबईचा गणेशोत्सव सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी स्वीकारलं आव्हान
जेव्हा मला ही मूर्ती बनवायची आहे, असे समजले, तेव्हा मला सुरुवातीला थोडी भीती वाटत होती. पण मी जिद्दीने बाप्पाची ही मूर्ती करायचीच असे ठरवले. या आधी परदेशामध्ये ४ ते ५ फुटांपर्यंत बाप्पाची मूर्ती पाठवली जात होती. पण यंदा मात्र तब्बल १६ फुटांची मूर्ती परदेशात पाठवली जात आहे. यामुळे एक नवा रेकॉर्ड होणार आहे. तसेच मुंबईतील गणेशोत्सवाचे नावही सातासमु्द्रापार पोहोचणार आहे, असेही निखील राजन खातू यांनी सांगितले.