मुंबईः सातारा सत्र न्यायालयानं आज गुणरत्न सदावर्तेंची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्तेंना 1 मेपर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर सातारा पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्तें यांची आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली होती. पण ती मागणी फेटाळत सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण आणि कोल्हापूर आणि सोलापूरच्या छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपात सदावर्तेंना सातारा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 15 एप्रिलला त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. अखेर त्याची मुदत आज संपली असता सातारा सत्र न्यायालयानं त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. त्यामुळे त्यांना आता मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार आहे.
दुसरीकडे गुणरत्न सदावर्तेंबरोबर सहआरोपी असलेल्या डॉ. जयश्री पाटील यांनासुद्धा मोठा दिलासा मिळालाय. त्यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिलेत. अॅड. जयश्री पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या अद्यापही न्यायालयात हजर झालेल्या नाहीत.
नेमकं काय आहे प्रकरण?
दोन वर्षांपूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका झाली होती. सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणीच गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टात हजर करण्यात आले होते.
हेही वाचाः मनी लाँड्रिंग प्रकरण; नवाब मलिकांना पुन्हा झटका, 22 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ