मुंबई : दोन वर्षांपूर्वी जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने हाहाःकार माजवला होता. ज्यामुळे भारतात दोन वर्षांसाठी लॉकडाऊन लावण्यात आला होता. मागील वर्षभरापासून देशातील कारभार पूर्वपदावर येत आहे. कोरोनापासून लोकांचा बचाव व्हावा, यासाठी कोविड लस तयार करण्यात आली. परंतु या लसीकरणाचे वेगवेगळे परिणाम अनेक रुग्णांवर दिसून आले. आनंदाची बाब म्हणजे कोविड लसीकरण घेतल्यामुळे 60 टक्के रुग्णांचे प्राण वाचले. तर, कोरोनावर उपचार घेणारे रुग्ण बरे झाल्यानंतर घरी गेले त्यातील 6.5 टक्के लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चने काल (ता. 21 ऑगस्ट) एक अहवाल सादर केला. या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. (Indian Journal of Medical Research reported the results of the COVID vaccination)
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक पोहोचले KEM रुग्णालयात, बंद वॉर्ड सुरू करण्याचे निर्देश
इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चकडून प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात संशोधकांनी सांगितले की, कोरोनासाठी स्थापन केलेल्या नॅशनल क्लिनिकल रजिस्ट्री अंतर्गत देशातील 31 हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांवर कोविड लसीकरणाची चाचपणी करण्यात आली. यासाठी, एकूण 14 हजार 419 रुग्णांची निवड करण्यात आली होती. संशोधकांच्या टीमने रुग्णालयातून घरी गेलेल्या रुग्णांचा किमान एकदा तरी फोनवर पाठपुरावा केला. ज्यानंतर यामध्ये असे दिसून आले की हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एका वर्षात 942 (6.5%) रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांना संसर्ग होण्यापूर्वी अन्य आजार देखील होते. संशोधकांकडून यावर्षी फेब्रुवारीपर्यंत रुग्णांचा पाठपुरावा करण्यात आला आणि ज्यानंतर याबाबतची माहिती प्रसिद्ध केली.
ICMR नुसार, संशोधकांनी रुग्णांची चाचपणी केल्यानंतर त्यांनी केलेल्या अभ्यासात असेही आढळून आले आहे की, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या पुरुष रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एक वर्ष त्यांच्या जीवाला अधिक धोका असतो. परंतु याच चाचपणीत असेही आढळून आले की, रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर कोरोनाची लस घेतलेल्यांमध्ये मृत्यूचा धोका 60% कमी झाला आहे. 18-45 वयोगटातील लोकांमध्येही असाच परिणाम दिसून आला.
2022 पासून 18 ते 45 वयोगटातील लोकांच्या थ्रोम्बोटिक घटनांवर कोरोना लसीकरणाचा नेमका काय परिणाम होतो याबाबतचा अभ्यास संशोधकांकडून करण्यात येत आहे. 18-45 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये अचानक मृत्यूचे प्रमाणा वाढल्याने त्याबाबत संशोधकांकडून अभ्यास करण्यात येत आहे. कोरोनानंतर 18 ते 45 वयोगटातील पुरुषांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने हे नेमके का होत आहे? याचा शोध घेण्यात येत आहे.