मुंबई : रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीवर गुरुवारी मध्यरात्री दरड कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 98 जणांना वाचविण्यात आले आहे. अद्याप काही लोक ढिगाऱ्याखाली असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनास्थळी शिवभोजन थाळीच्या पॅकेटचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला.
हेही वाचा – लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याला प्राधान्य, गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना फोन करून बचावकार्याची माहिती घेतली.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनास्थळी स्थानिक नागरिकांना व बचावकार्यात सहभागी झालेल्या सर्वांना मोफत शिवभोजन थाळी पॅकेटचे वाटप करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रांवरून हे पॅकेट देण्यात येणार आहेत.
तसेच ५ लिटर… pic.twitter.com/JqF2EHK7RY
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) July 20, 2023
एनडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी बचावकार्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सुमारे 98 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, सकाळी मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. इर्शाळगडाजवळ झालेल्या या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आणि तातडीने मदत पुरविण्याचे आदेश दिले.
घटनास्थळाच्या आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रांवरून ही अन्नाची पॅकेट देण्यात येणार आहेत. शिवाय 5 लिटर रॉकेल, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार असल्याचे छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच त्यांनी तातडीने रायगड जिल्हाधिकारी यांना याबाबतचे आदेश दिले.