मुंबई : राज्यात मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला मागील आठवड्यात शुक्रवारी (ता. 01 सप्टेंबर) जालन्यात वेगळे वळण लागले. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. त्याचवेळी 1 सप्टेंबरला पोलिसांकडून या आंदोलनाला चिरडण्यासाठी अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला. त्यावेळी आंदोलकांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आल्याचे देखील आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – वटहुकूम काढून राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा; ठाकरे गटाची मागणी
या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच घटनेच्या 3 दिवसानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत सरकारकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली. परंतु, या घटनेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचे वारंवार विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून लावून धरण्यात आली आहे. पण मराठा आंदोलनाच्या या प्रकरणाला राजकीय वळण देऊन ह्या प्रकरणाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेण्याती पार्श्वभूमी तयार केली जात आहे का? असा प्रश्न एका ज्येष्ठ कायदेतज्ज्ञाकडून उपस्थित करण्यात आला आहे. याबाबतची पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Jalna case for CM Eknath Shinde’s resignation? ‘That’ post on social media sparks debate)
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असिम सरोदे (Asim Sarode) यांनी याबाबतची पोस्ट त्यांच्या ट्विटर आणि फेसबूकला केली आहे. त्यांच्या या पोस्टने मात्र आता खळबळ उडाली आहे. “एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यासाठी आणि मागण्यासाठी पार्श्वभूमी व कारणे तयार केली जात आहेत का? कारण आरक्षण हा विषय तर राज्य सरकार सोडवू शकत नाही त्यासाठी केंद्र सरकारनेच संविधानिक सुधारणा केली पाहिजे. मराठा आरक्षण हा राजकीय विषय झालाय हे दुर्दैव.” अशा आशयाची पोस्ट सरोदे यांनी केली आहे. त्यामुळे जालन्यातील घटना ही एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेण्यासाठी वाढवली जात आहे का? असा प्रश्न या पोस्टमुळे निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यासाठी आणि मागण्यासाठी पार्श्वभूमी व कारणे तयार केली जात आहेत का? कारण आरक्षण हा विषय तर राज्य सरकार सोडवू शकत नाही त्यासाठी केंद्र सरकारनेच संविधानिक सुधारणा केली पाहिजे. मराठा आरक्षण हा राजकीय विषय झालाय हे दुर्दैव.
— Asim Sarode (@AsimSarode) September 6, 2023
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील (Jalna) अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गावात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मागील नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मात्र शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. जागोजागी बंद पुकारण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर आंदोलकांवर ज्यांनी लाठीचार्ज करण्यात आला त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज (ता. 06 सप्टेंबर) राज्यपालांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी वटहुकूम काढून राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.