आरोग्यमंत्री सकाळी उठले की मिडियासमोर जातात. विरारच्या हॉस्पिटलच्या घटनेकडे आरोग्यमंत्री फक्त बातमीच्या माध्यमातून या घटनेकडे पाहतात, यापेक्षा शरमेची बाब नाही. आरोग्यमंत्री बातम्यांच्या एंगलने रोज सकाळी लोकल, राज्याची आणि नॅशनल न्यूज म्हणून बघतात. त्यामुळे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी केली. विरार आगाची घटना ही ह्दय हेलावणारी घटना आहे. नाशिकच्या घटने पाठोपाठच विरारच्या हॉस्पिटलच्या घटनेत १३ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर काय प्रतिक्रिया द्यावी हा प्रश्न पडतो, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी दिली.
विरार हॉस्पिटलच्या घटनास्थळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आगीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांवर दरेकर प्रचंड नाराजी व्यक्त केली. आरोग्य व्यवस्थेवरील ताण मी समजू शकतो. पण पुन्हा पुन्हा होणाऱ्या चुकांमुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे. सरकारमधील लोक मुरदाडासारखे गप्प बसणार असतील तर या लोकांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. जर भंडारा, भांडूप या घटनांमधून सरकार बोध घेणार नसेल तर आपण सरकारमध्ये कशासाठी आहोत हा प्रश्न पडायला हवा. फक्त मिडियासमोर येऊन बोलण्यापेक्षा यंत्रणेतील चुका दुरूस्त केल्या असत्या तर निष्पाप लोकांचे बळी गेले नसते.
फक्त माध्यमांसमोर जावून वारंवार बोलण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यामधील पालकमंत्र्याने आपआपल्या जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये यंत्रणा तपासली असती तर शेकडो लोकांचे निष्पाप जीव गेले नसते. भंडारा, भांडूप आणि नाशिकमध्ये लोक लागोपाठ या घटनांमध्ये नाहक यंत्रणेच्या चुकांचा बळी पडत आहेत. मंत्र्यांनी मिडियासमोर बोलण्यापेक्षा आपआपल्या जिल्ह्यात ऑडिटचे काम केले असते तर लोक वाचले असते. सरकारने वेळीच या गोष्टी मॉनिटर करायला हव्यात असेही दरेकर म्हणाले. भंडाऱ्याच्या घटनेनंतर फायर ऑडिट करू असे आश्वासन देण्यात आले होते. पण त्यानंतरही वारंवार घडलेल्या घटनांमध्ये आपण बोध घेतलेला नाही. राज्यात किती फायर ऑडिट झाले ? याची माहिती सरकारने द्यावी.