मुंबई : उपनगरातील चांदिवली विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी शुक्रवारी (ता. 26 एप्रिल) पक्षाच्या स्टार प्रचारकाचा राजीनामा दिला. ज्यानंतर ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. काँग्रेसने महाराष्ट्रात 48 जागांपैकी एकाही जागेवर अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार न दिल्याने त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्याचे सांगितले. ज्यानंतर याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याच चर्चेदरम्यान आता काँग्रेस मुंबई अध्यक्ष आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या मविआच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. (Maharashtra Congress leader Naseem Khan meet Varsha Gaikwad)
आज शनिवारी (ता. 27 एप्रिल) काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. ज्यानंतर काही वेळातच पक्षाच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड या त्यांची भेट घेण्याकरिता त्यांच्या कार्यालयावर पोहोचल्या. या भेटीनंतर वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांसमोर म्हटले की, नसीम खान यांचे आणि माझ्या कुटुंबाचे जुने नाते आहे. माझे वडील होते, तेव्हापासून ते आमच्यासोबत एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे उभे राहिलेले आहेत. त्यामुळे मी आता लहान बहिण म्हणून त्यांच्या भेटीसाठी आले, असे वर्षा गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले.
हेही वाचा… Maharashtra Congress : इथून पुढे काँग्रेसचा प्रचार नाही, नसीम खान यांची उघड नाराजी
तसेच, नसीम खान हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहेत. ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी, नेते सोनिया गांधी यांचे एकनिष्ठ पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या प्रचारासाठी यावे आणि माझ्यासोबत प्रचारात उभे राहावे, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांच्याकडून करण्यात आले. ज्यावेळी बहिणीला भावाची गरज असते, तेव्हा भाऊ सोबत उभा राहतोच, त्यामुळे नसीम खान देखील सोबत राहतील, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
नसीम खान यांची नाराजी का?
शनिवारी (ता. 27 एप्रिल) पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते नसीम खान स्टार प्रचारकाच्या राजीनाम्याचे आणि नाराजीचे कारण सांगितले. पंरतु, त्याआधी शुक्रवारी त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून आपण स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नसीम खान यांनी सांगितले. आज पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार नसीम खान म्हणाले की, या महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुका चालू असताना 48 लोकसभांमध्ये एकही अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे समाजामध्ये पक्षाबद्दल तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातून विविध अल्पसंख्यांक संघटनेच्या नेत्यांनी, त्या संघटनेच्या प्रमुखांकडून फोनवरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे आणि त्याचमुळे त्यांनीही स्टार प्रचारकाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती नसीम खान यांच्याकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा… Sanjay Raut : कांदा निर्यातीच्या मुद्द्यावरून राऊतांचा केंद्रावर निशाणा, म्हणाले…