मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी डिसेंबर महिन्यात राजभवनात झालेल्या एका कार्यक्रमात शालेय विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा त्यानंतर भरवण्याबाबत शासन निर्णय जारी जारी करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून हा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. शालेय विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आहे. (The government issued a GR to change the timings of classes from KG to 4th Std)
हेही वाचा… लॅपटॉप, मोबाईलमधून निघणारी ‘ब्लू लाईट’ त्वचेसाठी धोकादायक
महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार, आता सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा त्यानंतर भरवण्या येणार आहेत. कारण सध्यस्थितीत अनेक सकाळच्या सत्रात 7 वाजता विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जातात. ज्यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही आणि त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे त्या शाळेत बदल करण्यात यावे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. त्यामुळे आता पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावी, असे अध्यादेशात सांगण्यात आले आहे.
तसेच, शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही, याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी, असेही नमूद करण्यात आलेले आहे. राज्यात अनेक शाळांच्या वेळा या सकाळी सात वाजताच्या आहेत. मात्र, आता शासनाच्या या निर्णयामुळे शाळा प्रशासनांना शाळेच्या वेळेमध्ये मोठे बदल हे करावे लागणार आहेत.
सकाळच्या सत्रात बहुतांश शाळांमध्ये केजी ते चौथी पर्यंतचे वर्ग भरवले जातात. ज्यामुळे या वेळांमध्ये आता बदल होणार आहे. हे वर्ग आता शक्यतः 9 वाजेच्या नंतर भरविण्यात येणार आहेत. तर, बाकी चाैथीनंतरच्या वर्गाचे जे वेळ अगोदरप्रमाणे आहेत, त्याचप्रमाणे राहणार आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती.