अंतरवाली सराटी (जालना) – मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी शेवटचे दोन दिवस सरकारकडे आहेत. आमच्या भावनांशी खेळू नका. सरकारने EWS चे नवे पिल्लू आणले आहे. ते आम्ही मागितलेले नाही. EWSची जाहिरातबाजी करुन आम्हाला वेड्यात काढू नका. तुम्ही 30 दिवस मागितले होते, मराठा समाजाने तुम्हाला 40 दिवस दिले. आता मराठा समाजासोबत दगा फटका करु नका. अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिला आहे.
24 तारखेनंतर मराठा आरक्षणासाठी निकराचे आंदोलन सुरु केले जाणार आहे. हे आंदोलन सरकारला झेपणार नाही, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार असल्याचे त्यांनी मराठा समाजासोबतच्या बैठकीत दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द मराठा समाजाने खाली पडू दिलेला नाही. त्यांनी 30 दिवस मागितले होते, मराठा समाजाने त्यांना 40 दिवस दिले. त्यांनीही आता मराठा समाजाचा सन्मान राखावा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सरटी येथे मराठा समाजासोबतच्या बैठकीत केले आहे.
मराठा समाजाला कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली होती. या समितीला महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून पुरावे मिळाले तर मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता, याचा पुनरुच्चार जरांगे पाटील यांनी या बैठकीत केला. सरकारने नेमलेल्या समितीला आता पुरावे मिळाले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे.
आता समितीने वेळ मागू नये आणि सरकारनेही त्यांना वेळ देऊ नये. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे मिळाले आहेत, त्यामुळे आता बहाणे नको, असे सांगत मनोज जरांगे पाटील म्हणाले, राजकीय इच्छाशक्ती असेल तर पुराव्यांचीही गरज नाही. यासाठी त्यांनी 1967, 1990 चे उदाहरण दिले. मराठा समाजाकडे पुरावे आहेत, त्यामुळे समितीला अभ्यास आणि आणखी पुरावे गोळा करण्याच्या नावाखाली आणखी जास्त वेळ न घेता आरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी केली.
राज्य सरकारला इशारा देत जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजात तुमच्याविषयी रोष निर्माण होऊ नये, आज मराठा समाज शांत आहे, यापुढेही शांत राहाणार आहे. परंतू मराठा समाजाच्या भावनेशी न खेळता सरकारने मराठा समाजाला आरक्षण देऊन न्या द्यावा. आरक्षण घेतल्याशिवाय हटायचे नाही, असं समाजाने ठरवलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठासमाजानेही पाठिंबा दिलेला आहे. आता मागे सरकायचे नाही, असाही निर्धार जरांगे यांनी केला आहे.
EWS नवे पिल्लू सोडू नका
EWS चे नवे पिल्लू सरकारने सोडले आहे. त्याचे फायदे आम्हाला सांगू नका. ते आम्ही मागितलेले नाही, ते आम्हाला देऊ नका. मराठ्यांनी आरक्षण मागितल्यावर सरकार आकडेमोड करायला लागली आहे. EWS चे फायदे आणि लाभ जाहिरातबाजी करुन सांगितले जात आहेत. सवलतीचे बहाणे आम्हाल सांगू नका. मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीमधून आरक्षण याशिवाय आम्हाला दुसरे काहीही नको आहे. कोणतीही मलमपट्टी आता नको, एकच उपचार आहे ते म्हणजे आरक्षण, असे सांगत दोन दिवसानंतर मराठा समाजाचे आंदोलन सुरु झाले तर ते सरकारला झेपणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.