मुंबई : राज्याच्या राजकारणातील आज, बुधवारचा दिवस महत्त्वाचा आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करणार आहेत. मात्र, या निकालाबाबत विरोधकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी जाहीरपणे याबद्दलची शंका उघडही केली आहे. तर, सत्ताधारी शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया ही शंका आणखी गडद करत आहे. त्यामुळे या निकालाबाबत तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा – पक्षांतर बंदी कायदा बदलला पाहिजे; आमदार अपात्रतेवर बोलताना Prithviraj Chavan यांच्याकडून BJP चा उल्लेख
राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर गेल्या वर्षी 11 मे रोजी त्याचा निकाल दिला होता. त्यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेची सुनावणी घेऊन निकाल देण्यास सांगितले होते. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी शिंदे गट तसेच ठाकरे गटाचा युक्तिवाद ऐकला. यादरम्यान, ठाकरे गटाच्या तक्रारीच्या आधारे सर्वोच्च न्यायालायने अध्यक्षांना 30 डिसेंबर 2023पर्यंत निकाल देण्यास सांगितले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी आणखी 10 दिवसांची मुदतवाढ करून घेत 10 जानेवारीला हा निकाल लावण्याचे निश्चित केले. त्यानुसार आज, बुधावरी हा निर्णय जाहीर होणार आहे.
पण या निकालाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, हा निर्णय दिल्लीतून झाला असल्याचा आरोप केला आहे. सर्व आधीपासूनच फिक्स झाले आहे, त्यामुळे आजच्या निकालाची केवळ औपचारिकताच आहे, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्रात येत आहेत. तसेच, मुख्यमंत्री शिंदे दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेला जात आहेत. हे ध्यानी घेता राज्यातील सरकार कायम राहणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हेही वाचा – MLA Disqualification Case : शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया म्हणाले; “आमची बाजू…”
येत्या 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाट तसेच शिवडी-न्हावा शेवा सी लिंकचे लोकार्पण करणार आहेत. तर, स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे 15 ते 19 जानेवारी या कालावधीत जागतिक आर्थिक परिषद होणार आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह दहा प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दावा केला आहे.
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राहुल नार्वेकर यांच्याबद्दल शंका व्यक्त केली आहे. रामशास्त्री प्रभूणे यांच्यासारखा निर्णय आजच्या युगामध्ये घेतला जाईल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण, याबाबतचा निकाल देण्याची जबाबदारी विधानसभेच्या अध्यक्षाकडे देणे, राजकीय पक्षाने निवडून आणलेल्या व्यक्तीकडे देणे हेच चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तर, या निकालापूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या झालेल्या भेटीबद्दल दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अध्यक्ष जर का निकाल देण्याआधी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतील तर ते संशयास्पद आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा – MLA Disqualification Case : “आजचा निकाल हा बेंचमार्क ठरेल”, राहुल नार्वेकर यांचा दावा
ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांनी देखील, विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, हे धक्कादायक आहे आणि घटनेच्या कुठल्याच नैतिकतेत बसत नाही, असे म्हटले आहे. शिवाय, आमदार अपात्रता प्रकरणाची चौकशी सुरू असताना राहुल नार्वेकर यांनी माध्यमांसमोर बोलायचे नाही हा पहिला नियम आहे. तर मग, ते कुठल्या अधिकाराने माध्यमांशी बोलत आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
शिंदे गटाकडून विजयाचा दावा
एकीकडे, अशी शंका व्यक्त होत असताना दुसरीकडे, आमची बाजू सत्याची आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, असा सूर शिंदे गटाने लावला आहे. आमची बाजू सत्याची आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले. आमदार संजय शिरसाट यांनी, निकाल आमच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, हा निकाल आमच्या बाजूने लागेल आणि ठाकरे गटाचे सगळे 16 आमदार अपात्र होतील, असा दावा आमदार योगेश कदम यांनी केला आहे.
राहुल नार्वेकर काय सांगतात?
आमदार अपात्रता प्रकरणाबाबत केंद्रस्थानी विधानसभा अध्य़क्ष राहुल नार्वेकर आहेत. 10व्या सूचीतील ज्या बाबींचा उल्लेख झाला नव्हता, तो या निर्णयात असेल. कायद्याचे तंतोत पालन केले जाईल. या निर्णयात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची ग्वाही देतो. तसेच हा निकाल बेंचमार्क ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपाची काय तयारी?
या निकालाबद्दल भाजपाला काय वाटते आणि त्याचा सरकारवर काय परिणाम होईल, याबाबतही चर्चा रंगली आहे. पण भाजपाने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय संपूर्ण देशासाठी दिशादर्शक असेल आणि तो सर्वांना मान्य करावा लागेल. तथापि, एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला फरक पडणार नाही, अजित पवार यांचे आमदार सरकारसोबत आहेत, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.