देशात मागील १५ महिन्यांपासून कोरोनाने हाहाकार घातला आहे. कोरोनाचा शिरकाव भारतात झाल्यापासून सर्वत्र आणि माध्यमांद्वारे कोरोनाच्या बाबतीत ऐकायला आणि पाहायला मिळते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात पुन्हा हाहाकार घातला आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव जलद होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील १५ महिन्यांपासून सारखे कोरोना विषयीच्या बातम्या बघून सर्वसामान्यांची मानसिक स्थिती अतिशय नकारात्मक झाली आहे. त्यामुळे येत्या रामनवमीला माध्यामांनी सकारात्मक बातम्या दाखवाव्यात अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी लोकांची मानसिक स्थिती सकारात्मक आणि नैराश्य दूर करण्यासाठी माध्यमांना येत्या रामनवमीला १ दिवस सकारात्मक बातम्या दाखवण्याचे आवाहन केले आहे. बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मागील १५ महिने सातत्याने कोरोना विषयी बातम्या बघून सर्वसामान्यांची मानसिक स्थिती अतिशय नकारात्मक झाली असे अनेक सर्वे मधे दिसून आले. तसेच केवळ या नकारात्मकतेमुळे अनेक लोकांनी काहीही नसताना आत्महत्या देखील केल्या. त्यामुळे माझी सर्व माध्यमांना विनंती आहे की येत्या “रामनवमी”ला केवळ १ दिवस कोरोना सोडून बाकी सकारात्मक बातम्या दाखवाव्यात. जेणेकरून लोकांची मानसिकता बदलण्यास मदत होईल. असे ट्विट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.
1 दिवस कोरोना सोडून बाकी सकारात्मक बातम्या दाखवाव्यात. जेणेकरून लोकांची मानसिकता बदलण्यास मदत होईल. @zee24taasnews @TV9Marathi @abpmajhatv @News18lokmat
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) April 19, 2021
मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव भारतात झाला. यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला होता. हा लॉकडाऊन नंतर वाढत गेला. घरात बसून सर्वसामान्यांना आर्थिक आणि इतर समस्यांमुळे नैराश्य आले होते. यातून अनेकांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. लोकांचे नैराश्य दूर व्हावे आणि मनोरंजनासाठी महाभारत, रामायण हा कार्यक्रम पुन्हा प्रदर्शित केला होता. या कार्यक्रमाने टेलिविजन क्षेत्रातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते.