घरमहाराष्ट्रनाशिकगतवर्षीच्या तुलनेत धरणांत २८ टक्के कमी जलसाठा; नाशिक जिल्ह्यात दुष्काळग्रस्त स्थिती

गतवर्षीच्या तुलनेत धरणांत २८ टक्के कमी जलसाठा; नाशिक जिल्ह्यात दुष्काळग्रस्त स्थिती

Subscribe

नाशिक : अडीच महिने उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने नाशिक जिल्ह्यातील धरणांची तहानही भागू शकलेली नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अजूनही धरणांमधील पाणीसाठा 28 टक्क्यांनी कमीच आहे. गतवर्षी ९४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. अनेक तालुक्यांमधील रहिवाशांनी गेल्या अडीच पावणे तीन महिन्यांत मुसळधार पाऊसच अनुभवलेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची चिंता शेतकर्‍यांना लागली आहे. आजमितीस जिल्ह्यातील २४ धरण प्रकल्पांत अवघा ६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

नाशिकसह जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अलनिनो वादळाच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर पडला. त्यामुळे अडीच महिन्याचा कालावधी उलटूनही समाधानकारक पाऊस नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे धरणे भरलेली नाहीत दुसरीकडे जूनच्या पावसावर शेतकर्‍यांनी खरिपाचा हंगाम सुरु केला. मात्र, अशातच पावसाने तीन महिन्यापासून दडी मारल्याने पिके करपण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

- Advertisement -

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा वाढण्यावरही मर्यादा आल्या आहेत. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची मिळून 24 धरणे आहेत. या धरणांची पाणी साठवण क्षमता 65 हजार 664 दशलक्ष घनफूट आहे. सध्या धरणात 43 हजार 273 दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 19 हजार 420 दशलक्ष घनफूट पाणी कमी आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठादेखील गेल्यावर्षीच्या तुलनेत चार टक्के पाणीसाठा कमी आहे. गेल्यावर्षी 95 टक्के पाणीसाठा होता. यंदा 11 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर धरणसमूहातील पाणीसाठा 18 टक्क्यांनी कमी आहे.

खरीप हंगामातील पिकांची चिंता

नाशिक जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. जिल्ह्यातील पर्जन्यमान या कालावधी 348 मिलिमीटरपर्यंत जाण्यापेक्षा असताना यंदा मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे अजूनही जिल्ह्यातील पाऊस 60 टक्क्यांच्या पुढेही सरकलेला नाही. सर्वच ठिकाणी सरासरीपेक्षा पाऊस कमी असल्याने शेतकर्‍यांना चिंता आहे. पुरेसा पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांची चिंता शेतकर्‍यांना लागली आहे. तर पुढील पिकांच्या लागवडीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत महत्त्वाचे पीक म्हणून ओळख असलेल्या भात पिकाच्या वाढीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. धरणांचा जिल्हा म्हणून अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील काही धरणांच्या साठ्यात वाढ दिसत आहे. तर काही धरणांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -