इगतपुरी : मोदी सरकारने जनतेचे मूळ मुद्दे बाजुला सारल्याने देशात बेरोजगारांची संख्या वाढली असून आपल्या देशाची ओळख ही बेरोजगारांचा देश अशी झाली आहे. महागाईमुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले असून केंद्रातील सरकार सपशेल फेल झाले आहे. बावनकुळेंच्या आरोपांचा समाचार घेत नाना पाटोले म्हणाले की, गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहे. आज आमची प्रशिक्षण शिबिराची रणनिती होती. मात्र आगामी महापालिकेच्या निवणुकीत आमचे काँग्रेस चांगले प्रदर्शन करेल. तसेच भाजप व शिवसेनेची गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता राहिली आहे.
मात्र आगामी निवडणुकांत भाजप हा आमचा मुख्य प्रतिस्पर्धी राहणार आहे. त्या पद्धतीने आमची भूमिका स्पष्ट राहणार आहे. इगतपुरीतील बलायदुरी येथील रेनफॉरेस्ट येथे तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुंबई काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराची सांगता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाने झाली. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आमदार हिरामण खोसकर, ज्येष्ठनेते संदीप गुळवे, तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी पंचायत समिती सभापती गोपाळ लहांगे आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश
इगतपुरी तालुक्यातील जेष्ठनेते, युवा कार्यकर्ते व सरपंच, उपसरपंच, चेअरमन, माजी सरपंच, ग्रामपंचयत सदस्य यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी नाशिक जिल्ह्याच्या प्रवेशद्वार तथा घाटनदेवीच्या पायथ्याशी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार हिरामण खोसकर, जिल्हानेते अॅड. संदीप गुळवे, तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी सभापती गोपाळ लहांगे, कचरू पा. शिंदे, खंडेराव भोर, गणपत राव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका लक्षात घेता हा प्रवेश सोहळा झाला. त्यामुळे आगामी काळात युवकांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात राहील असे अॅड. संदीप गुळवे यांनी सांगितले.