नाशिक : शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत सापडली आहे. बँकेला वाचवण्यासाठी सहकार क्षेत्रातील व्यक्तिंनी जिल्हा बँक वाचवा, ठेवीदार वाचवा!’ ही मोहिम हाती घेतली असून, याविषयी बँकेचे प्रशासक अरुण कदम यांना निवेदन दिले.
जिल्हा बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी उपाययोजना करावी, बँकेतील सभासद, सहकारी संस्था, खातेदार, ठेवीदार, शेतकरी, कर्जदार, संवाद व्यापक पातळीवर करावा, असे आवाहन या शेतकऱ्यांनी व सहकार क्षेत्रातील व्यक्तिंनी केले. राज्य व केंद्र शासनाने सहकार वाचवण्यासाठी बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी आपण प्रस्ताव तयार करावा, तसेच यापुढील काळात बँकेच्या वाटचाली संदर्भात निर्णायक आराखडा तयार करून मांडणी करावी, अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली.
नाशिक जिल्हा सहकारी बँक वाचवा, सहकार वाचवा चळवळ काम करेल, असे आश्वासीत केले. यावेळी राजेंद्र भोसले, मनोहर देवरे, राजू देसले, राजेंद्र पवार, शांताराम ठाकरे, संपतराव वक्ते, संपतराव जाधव, प्रभाकर धात्रक यांनी नाशिक जिल्हा बँक प्रशासक अरुण कदम यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे उपस्थित होते.