राजूरः मीटर नसतानाही शेतकर्यांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देणार्या महावितरणच्या राजूर कार्यालयाविरोधात स्थानिक शेतकर्यांनी संताप व्यक्त केला. वीज कार्यालयात गेल्यावर अधिकारी व कर्मचारी विनंती करूनही बिल भरावेच लागेल, असे सांगत मनमानी पद्धतीने वागतात. अशा तक्रारींचे लेखी निवेदनच शेतकर्यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना दिले.
राजूर येथील शेतकरी हेमंत देशमुख यांनी आठ वर्षांपूर्वी सहायक कार्यकारी अभियंता यांच्याकडे विहिरीसाठी मीटरची मागणी केली होती. संबंधित अधिकार्याने त्यांना वीजमीटर तर दिले नाहीच, उलट १ लाख १० हजारांचे सरासरी वीजबिल हाती देत हे बिल भरावेच लागेल, असे सांगितले.
शेतकर्यांची पिके संकटात असतानाच विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे उद्योग सुरू आहेत. पावसाळ्यात पाण्याची आवश्यक गरज नसते. उन्हाळ्यात विहिरीत पाणी नसते, हिवाळ्यात पाणी असते तर वीज कापलेली असते. असे असतानाही ८ वर्षांचे ८ तासाप्रमाणे सरासरी बिल देत शेतकर्यांना अडचणीत टाकण्याचे काम महावितरणकडून सुरू असल्याची तक्रार शेतकर्यांनी केली.
वीज कार्यालयात गेल्यास भेटू न देणे, फोन न घेणे असे प्रकार सुरू असल्याचे सतीश देशमुख, हेमंत देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे. आठ वर्षे उलटूनही एकच अधिकारी कार्यरत कसा, असा सवाल करत संबंधित अधिकार्याची तातडीने बदली करत सक्षम अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली.