नाशिक : पाच वर्षांपूर्वी मी नाशिक दत्तक घेतले; परंतु, दत्तक विधानावरून विरोधकांनी टिका केली. काही लोकांच्या मते दत्तक घेणे म्हणजे रोज महापालिकेत हस्तक्षेप करून दलाली खायची असा होतो. परंतू असे नव्हे, शहरात एवढी कामे झाली आहेत, त्याच कारण आम्हाला राज्य दलाली खाण्यासाठी नाही, तर लोकांची काम करण्यासाठी हवे असते,अन नाशिकमध्ये होत असलेले परिवर्तन नाशिककर बघत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी शंभर प्लसचा नारा देतांनाच आपण सर्वांनी निवडणुकीत पूर्ण ताकदिशी उतरावे,असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले .
मनोहर गार्डन येथे भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी महापालिका निवडणुक प्रचाराचे रणशिंग फुंकले. यावळी बोलतांना फडणवीसांनी ठाकरे सरकारचा दलाली खाणारे सरकार असा उल्लेख करत टीका केली . काही जणांना राज्य फक्त दलाली खाण्यासाठी पाहिजे असते, मात्र आम्ही नाशिकचा विकास केला म्हणून आज शहराची परिस्थिती सुधारली आहे, असा घणाघात फडणवीसांनी केला. नमामि गोदा, आयटी हब, समृध्दी महामार्ग, सुरत चैन्नई महामार्ग यासारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून नवनाशिकच्या निर्मितीच्यादृष्टीने एक महत्वपूर्ण पाउल टाकल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्याच्या सुरूवातीला शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार अॅड. राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे यांची भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी मंत्री तथा नाशिकचे प्रभारी जयकुमार रावल, संघटनमंत्री रवी अनासपुरे, महापौर सतिश कुलकर्णी, धुळयाचे महपौर प्रदिप कर्पे, आमदार देवयानी फरांदे, आमदार अॅड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, विजय साने, पवन भगुरकर, प्रशांत जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
नेत्यांना कानपिचक्या
निवडणुकीत नेत्यांनीही नात्यागोत्यांपेक्षा कार्यकर्त्यांना संधी द्यावी. कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष आहे असे सांगत फडणवीस यांनी नेत्यांना कानपिचक्या दिल्या. जागा मर्यादित आहे, इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मला उमेदवारी मिळाली तर न्याय, अन नाही मिळाली तर अन्याय ही भावना असता कामा नये. उमेदवार मिळो अथवा न मिळो काम करायचे आहे असा सल्लाही त्यांनी दिला.