जागतिक मंदीमुळे व्यापारी वर्ग हातावर हात धरुन बसलेला असताना स्मार्ट रोडचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे महात्मा गांधी रोडवरील बाजारपेठ संकटात सापडली आहे. दसर्याला ग्राहकांनी पाठ फिरवल्याने व्यापारी वर्गात नाराजी आहे. स्मार्ट रोडच्या कामातील दिरंगाईच्या निषेधार्थ व्यापार्यांनी सोमवारी (दि.१४) दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान बाजारपेठ बंद ठेवून निषेध केला. व्यापार्यांनी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना निवेदने देत नाराजी व्यक्त केली.
शहरात दोन वर्षांपासून स्मार्टसिटी अंतर्गत त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ स्मार्ट रोडचे काम सुरू आहे. कामाचा कालावधी उलटूनदेखील अद्याप काम झालेले नाही. रस्ते बंद असल्याने ग्राहकांना बाजारपेठेत येताना मनस्ताप सहन करत अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांनी नो पार्किंगमध्ये वाहने पार्क केली तर पोलीस कारवाई करतात. त्यामुळे बाजारपेठेकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. दिवाळी तोंडावर असताना ग्राहकांनी पाठ फिरवल्याने व्यापारी वर्गात महापालिकेच्या भूमिकेबाबत संताप आहे. व्यापार्यांनी सोमवारी (दि.१४) दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून स्मार्ट रोडच्या कामाबाबत निषेध व्यक्त केला. दुपारी चार वाजेच्या सुमारास व्यापार्यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेत नाराजी व्यक्त करत निवेदन दिले.
व्यापार्यांचा आंदोलनाचा इशारा
व्यापार्यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांंची भेट घेत गार्हाणी मांडली. मात्र, व्यापार्यांना त्यांच्याकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही. पुढील दोन दिवसांत स्मार्ट सिटी रोड सुरू करावा, अन्यथा व्यापारी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा व्यापार्यांनी दिला आहे.