उल्हासनगर शासकीय प्रसुतीगृहात काल मध्यरात्रीच्या सुमारास एका गरोदर महिलेस दाखल केल्यानंतर काही वेळानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलेचे नातेवाईक आणि संतप्त जमावाने रुग्णालयात ठिय्या आंदोलन करून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. उल्हासनगर – ४ येथील मौर्यानगरी मधील रामदास भोईर चाळीत राणी केशव पटेकर (२८) ही महिला तिच्या कुटुंबियांसह राहत होती. राणी ही गरोदर होती, तिच्या पोटात वेदना होत असल्यामुळे तिला तातडीने शासकीय प्रसुतगृह येथे काल रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास दाखल करण्यात आले, तेथे उपचार घेत असताना १.३० वाजता राणीचा मृत्यू झाला.
राणीच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली, दरम्यान ही बातमी वाऱ्यासारखी रातोरात पसरली आणि मोठा जमाव रुग्णालयात जमा होऊ लागला. राणीचा मृत्यू हा तिच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमुळे झाला असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान रुग्णालयात जमलेल्या जमावाने रुग्णालयातच ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.
हे वाचा – ६ जणांच्या हत्येनंतर ती म्हणाली, ‘आता फक्त स्वत:च्याच मृत्यूचं आकर्षण’!
राणी पटेकर यांना उपचारासाठी जेव्हा रुग्णालयात दाखल केले, तेव्हा तिथे डॉक्टर उपलब्ध नव्हते, परिचारिका आणि आया यांनी राणी यांची रक्ततपासणी केली. रक्तदाब तपासला तेव्हा तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आणि रुग्णाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करा, असे सांगितले. मात्र काही वेळानंतरच राणीचा मृत्यू झाला. उपचारासाठी डॉक्टर वेळेवर उपलब्ध झाले असते तर राणीचा मृत्यू झाला नसता. – निलेश पटेकर (मृत राणी पटेकर यांचा पुतण्या)
या घटनेनंतर रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा रुग्णालय प्रशासनाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला कळविले. नंतर ४ पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले, मात्र त्यांना परिस्थिती नीट हाताळता आली नाही. रुग्णालयात महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. पुरुष कर्मचारी कमी आहेत, सुरक्षा रक्षक देखील केवळ २ आहेत त्यामुळे आमच्या जीवाला धोका असल्याची भीती महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अशा करतेय निराशा
शहरातील प्रत्येक प्रभागात शासनातर्फे गरोदर महिलांसाठी “आशा” ही महिला नेमलेली असते प्रत्येक गरोदर महिलेची काळजी घेणे, तिच्या उपचारांचा पाठपुरावा करणे तिचे काम असते. शासन तिला मानधन सुध्दा देत असते, अशावेळी या आशा नेमके काय काम करतात, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे रुग्णवाहिनी साठी १०८ क्रमांक देण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा आणि चौकशी करण्यात अर्धा – पाऊण तास जातो. त्यामुळे ही सेवा देखील तातडीच्या वेळी उपयोगात पडत नाही, असा आरोप रुग्णमित्रांनी केला आहे.