इगतपुरी : शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गाचे रखडलेले काम अखेर मार्गी लागले आहे. या रस्त्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला भरीव निधी मिळवून दिला होता. हा निधी मिळताच ठेकेदार व अभियंतांच्या समन्वयातून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे रस्त्याच्या दूरवस्थेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.रस्ता चांगला व दर्जेदार व्हावा यासाठी अर्थात रस्ते दीर्घकाळ चांगले राहावेत, यासाठी काही दिवस लागतात. मात्र, याची माहिती नागरिकांना नसल्याने या कामाला विलंब झाल्याचा नागरिकांचा गैरसमज झाला, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता सीमा जाधव यांनी दिली.
अन्य गावातून येणार्या नागरिकांना हाच मुख्य रस्ता आहे. त्यामुळे बाजारपेठेत जाण्यासाठी तळेगाव, जोगेश्वरी, आठचाळ, सहाबंगला, शिवाजीनगर, गावठा, पिंपरी, नांदगांव, फांगुळगव्हण इ. गावांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळेच, रस्ताचे काम करतांना एका बाजूचा भाग वाहतुकीसाठी सोडून दुसर्या बाजूचा भागाचे काम करावे लागेल. त्यासाठी किमान २१ दिवसांचा कालावधी लागेल. तोपर्यंत नागरिक व वाहनधारकांनी नवीन रस्त्यावरुन मार्गक्रमण करू नये, असे आवाहन ठेकेदार आकाश नागरे यांनी नागरिकांना केले.
या रस्त्यांचे काम आमदार हिरामण खोसकर यांनी दिलेल्या निधीतून केले जात आहे. २५ डिसेंबर रोजी या रस्त्याच्या कामांचे उद्घाटन आमदारांच्या हस्ते करण्यात आले होते. शहरातील रस्ता चांगल्या प्रतिचा तयार केला जात असताना वाहनधारक व नागरकांची गैरसोय टाळण्यासाठी एकतर्फा वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे. तसेच, नवीन कामाच्या सुरक्षेसाठी किमान २१ दिवस साईड पत्रे व बॅरिकेड्स लावले जाणार आहेत. नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा आणि शहरातील मुख्य रस्त्याच्या कामास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
इगतपुरी शहरातील मुंबई आग्रा जुन्या महामार्गाच्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. मात्र, रस्ता चांगला व दर्जेदार व्हावा यासाठी किमान २१ दिवसांचा कालावधी लागतो. तोपर्यंत नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करुन सहकार्य करावे. जेणेकरून रस्ता अधिक काळ चांगला राहण्यासाठीचे काम सुरू राहिल.
– सीमा जाधव,अभियंता, सा. बां. विभाग