महाराष्ट्रातील भाजपचे अनेक विद्यमान आमदार आमच्या संपर्कात आहेत. नजिकच्या भविष्यात भाजप पक्ष निश्चितपणे फुटणार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज भाजपला इशारा दिला. मालेगावमध्ये काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस व शिवसेना खाण्याचे काम करीत असल्याची टीका केली होती या टिकेला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले. भाजपचे अनेक विद्यमान आमदार नाराज आहेत. ते भाजपमधून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. आगामी काळात राज्यात भाजप पक्ष फुटणार आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी काळजी घ्यावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी यानिमित्ताने दिला.
भाजप नेत्यांच्या वायनरी बंद करणार का
सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याबाबतचा निर्णय अलिकडेच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला. या टिकेलाही नवाब मलिक यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस बिनबुडाचे आरोप करतात. सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय विदेशी कंपन्यांच्या हितासाठी घेण्यात आल्याचा आरोप भाजपचे नेते करतात पण भाजपशासीत मध्य प्रदेश, गोवा आणि हिमाचल प्रदेशात हा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वाइनसंदर्भातील निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. भाजपचा वाईनला इतका विरोध आहे तर भाजप नेत्यांच्या मालकीचे वाइननिर्मिती कारखाने, डिस्टलरीज आणि वाइन शॉप्स बंद करणार का, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.
हेही वाचा – लिव्ह इन रिलेशनशीप पुरस्कर्त्या न्यायाधीशांना संपवले पाहिजे, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य