घरमहाराष्ट्रआता मोदी सरकारविरोधात चले जाव आंदोलन करण्याची गरज - अशोक चव्हाण

आता मोदी सरकारविरोधात चले जाव आंदोलन करण्याची गरज – अशोक चव्हाण

Subscribe

ज्याप्रमाणे ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी इंग्रजी राजवटीविरूद्ध चले जाव असा नारा दिला. त्याप्रमाणे आता मोदी सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ आली असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

“स्वातंत्र्यलढ्याला विरोध करून ब्रिटिशांची चापलुसी करणाऱ्यांचे अनुयायी आज सत्तेवर बसून, देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जुलमी ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील लढाईप्रमाणेच आजच्या सरकारविरोधात ‘चले जाव’ची लढाई लढावी लागेल”, असा टोला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारला लगावला आहे. तसेच भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन देखील अशोक चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अशोक चव्हाण यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मोदी सरकावर जोरदार टीका केली.

ब्रिटिशांची चापलुसी करणाऱ्यांचे अनुयायी आज सत्तेवर

आजचा दिवस स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. ऑगस्ट क्रांतीचा लढा आपल्या सर्वांना प्रेरणा आणि शक्ती देणारा आहे. महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ आंदोलनाची हाक दिली. जात, धर्म, पंथ विसरून देशातील गरीब, श्रीमंत असे सर्व वर्गातील लोक या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाने देशाला राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही मुल्ये दिली. त्यावेळी या आंदोलनाला विरोध करून ब्रिटिशांची चापलुसी करणाऱ्यांचे अनुयायी आज सत्तेवर बसून ही मुल्ये संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली.

- Advertisement -

मराठा विरूद्ध इतर समाज असा वाद पेटवला जातोय

भाजप सरकारने पुन्हा पारतंत्र्यांसारखी परिस्थिती आणली आहे. देशात ४५ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतमालाला भाव नाही म्हणून शेतकरी शेतमाल, भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी देशभरात आणि राज्यात विविध समाजाचे लोक रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहेत. महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. लोकांनी काय खायचे? कोणते कपडे वापरायचे? यावर बंधने आणली जात आहेत. माध्यमांची गळचेपी सुरु आहे. गोरक्षणाच्या नावाखाली दलित, अल्पसंख्यांक समाजातील निष्पाप लोकांच्या कत्तली केल्या जात आहेत. जमावाकडून निष्पाप लोकांच्या हत्या केल्या जात आहेत. मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळवत ठेवून मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी इतर समाजाच्या नेत्यांना याबाबत विश्वासात घ्यावे आणि परस्पर सामंजस्याने सरकारचा कुटील डाव हाणून पाडावा तसेच समाजविघातक प्रवृत्तींना चले जाव असे सांगण्याचा संकल्प करावा, असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

आणखी वाचा – ऑगस्ट क्रांती दिन’ स्वातंत्र्याची नवी पहाट!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -