कोरोनामुळे दोन वर्ष सर्व सण-उत्सववार निर्बंध होते, इच्छा असूनदेखील उत्सव साजरे करता आले नाहीत. उत्सवांवर मर्यादा होत्या. परंतु या वर्षी सर्व मंडळाचा उत्साह आणि गेले दोन वर्षांची मर्यादा लक्षात घेऊन यंदा दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम उत्साहात साजरे करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही सणांवर कसलेही निर्बंध नसून, सर्व सण-उत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले. आज गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीत हे निर्णय़ घेण्यात आले आहेत.
हेही वाचा – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा! गणेश मूर्तींवरील उंचीची मर्यादा हटवली
बैठकीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी दिली. एकनाथ शिंदे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेले दोन वर्षे कोणतेही सण-उत्सव साजरे झाले नव्हते. प्रत्येक उत्सवावर मर्यादा आली होती. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आम्ही निर्बंधमुक्त सण साजरे करण्याचे जनतेला आवाहन करतो आहोत. या संदर्भात पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
काय घोषणा केल्या?
- आगमन-विसर्जनच्या मार्गावरील खड्डे दुरुस्ती करण्याचे आदेश
- मंडपाच्या परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजेत यासाठी एक खिडकी योजना राबवणार
- क्लिष्ट अटी-शर्थी नको, तत्काळ परवानगी देण्याचे निर्देश
- या मंडळांना कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क भरावे लागू नये याचे निर्देश
- सण-उत्सव काळात सामाजिक नियम, समाजप्रबोधन करा. नियम पाळा.
- गणेशोत्सव हा सामाजिक भावनेतून साजरा केला जातो. नियम पाळले गेलेच पाहिजेत. मात्र नियमांचा अवास्तव बाऊ केला जाऊ नये.
- मुंबईप्रमाणेच राज्यभर नियम राबवण्याच्या सूचना दिल्या.
- नोडल अधिकारी मिळाले तर समन्वय समितीली अडथळा राहणार नाही.
- कोविडमुळे गणपतीच्या उंचीवर मर्यादा होती, यावेळेस उंचीवरची मर्यादा काढून टाकली.
- विसर्जन घाटावर प्रकाशव्यवस्था करण्याची सूचना, मार्गावरही प्रकाशव्यवस्था करणार
- मूर्तीकारांसाठी जागा उपलब्ध करून देणार
- धर्मादाय आयुक्तालयातही ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुविधा
- गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील ध्वनी प्रदूषण तसेच इतर काही लहान गुन्हे नोंदवले गेले असतील, ते व्यवस्थित तपासून काढून टाकण्यासंदर्भात पोलिसांनी कार्यवाही करावी.
- दहीहंडीत हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे नियम पाळावेत
- सण-उत्सव शांततेत पार पडले पाहिजे, उत्साहात पार पडले पाहिजे.
- गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी टोलमाफी
- पीओपीच्या मूर्तींबाबत एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल.
- गणेशोत्सव कार्यकर्त्यांसाठी पूरस्कार योजना सुरु करण्यात येईल.
- धर्मादाय आयुक्तांनी मंडळ नोंदणीसाठी ऑनलाईन व्यवस्था असावी.
- दही हंडीच्या उत्सवात लहान गोविंदाबाबत (१४ वर्षांच्या आतील) न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे.