ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथे लाखो रुपये खर्च करून बेघर आळी, उंबरवाडीसाठी अंबा नदी पात्राशेजारी बांधण्यात आलेला गणपती विसर्जन घाट सध्या दारुड्यांचा अड्डा झाला आहे. त्यांनी तेथे राजरोसपणे मांडलेल्या उच्छादामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
संध्याकाळच्या सुमारास दारू ढोसण्यासाठी हौशे-नवशे तेथे जमा होतात. देशी-विदेशी दारू गावाताच उपलब्ध होत असल्याने ही मंडळी निवांतपणाच्या नावाखाली घाटावर मैफल जमवितात. दारू ढोसल्यानंतर रिकाम्या बाटल्या घाटावरच फोडून टाकतात. त्यामुळे घाटावर तसेच अंबा नदी पात्रात काचांचा खच पडला आहे. या घाटावर कपडे धुण्यासाठी येणार्या महिलांना त्याचा त्रास होतो. अनेकदा पायाला काचा लागून जखमा होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या दारूड्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी संतप्त नागरिक करीत आहेत.
ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून गणपती घाट बांधला आहे. या घाटावर संध्याकाळी दारुडे हैदोस घालतात. त्याचा लोकांना त्रास होतो. पोलीस यंत्रणेने त्यांचा कठोरपणे बंदोबस्त करावा.
-दिनेश काटकर, सामाजिक कार्यकर्ते