मुंबई : राजधानी दिल्लीत लोकसभेचे कामकाज सुरू असताना तेथील सुरक्षा भेदून दोन युवकांनी प्रेक्षक गॅलेरीतून उडी घेत सभागृहात घुसखोरी केली. या दोघांनाही खासदारांनी पकडले आणि सुरक्षा रक्षकांच्या हवाली केले. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत केंद्र सरकारच्या सतर्कतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
हेही वाचा – संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी; लोकसभेत स्मोक कँडल जाळली, चार जण ताब्यात
प्राथमिक माहितीनुसार, म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावाचा व्हिजिटर पास घेऊन दोन्ही युवक लोकसभेच्या प्रेक्षक गॅलेरीत आले होते. त्यांनी या गॅलरीमधून थेट सभागृहात उडी घेतली आणि स्मोक कँडल फोडले. यामुळे लोकसभेत धूर झाला आणि गोंधळ उडाला. यातील एक तरुण मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील असल्याचे समोर येत आहे. त्याचे नाव अमोल शिंदे असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुरुवातीला या दोघांचा ससंदेत घुसण्याचा उद्देश मात्र समोर आलेला नाही.
संसदेवरील हल्ल्याला आजच २२ वर्षे पूर्ण होत असताना तीन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन लोकसभेत केलेला गोंधळ ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आणि सुरक्षेततेतील अक्षम्य त्रुटी आहे. सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय? असा प्रश्न माझ्यासारख्याला यानिमित्ताने… pic.twitter.com/tikdksXSeG
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 13, 2023
संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी अतिरेकी हल्ला करण्यात आला होता आणि नेमक्या याच दिवशी ही घटना घडल्यामुळे उपस्थित खासदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचपार्श्वभूमीवर विधिमंडळात असे काही होऊ नये म्हणून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवीन लोकांसाठी गॅलरी पास देण्याचे बंद केले आहेत. तर, विधानसभेतही प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त दोन पास देण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली आहे.
हेही वाचा – Parliament Security Breach : अज्ञातांच्या स्मोक कँडलनंतर लोकसभेत चर्चेचा धूर; विरोधक आक्रमक
तथापि, या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी देशाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. संसदेवरील हल्ल्याला आजच 22 वर्षे पूर्ण होत असताना अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून लोकसभेत केलेला गोंधळ, ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आणि सुरक्षेततेतील अक्षम्य त्रुटी आहे. सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर, देशाचं काय? असा प्रश्न माझ्यासारख्याला यानिमित्ताने पडल्याशिवाय रहात नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Jitendra Awhad : जनतेला ‘पेज थ्री’ चर्चेमध्ये गुंतवून ठेवण्याचा डाव, आव्हाडांचा सरकारवर निशाणा