सीबीआय प्रमुख सुबोध जैस्वाल यांनी फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने पाठवलेल्या प्रश्नावलीला प्रतिसाद दिला आहे. सायबर विभागाने सुबोध जैस्वाल यांना समन्स बजावून १४ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु सुबोध जैस्वाल चौकशीसाठी हजर राहिले नव्हते यानंतर जैस्वाल यांना सायबर विभागाकडून प्रश्न पाठवले होते. त्या प्रश्नांचे उत्तरे शुक्रवारी पाठवण्यात आले आहेत.
राज्यातील फोन टॅपिंग प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) प्रमुख सुबोध जैस्वाल यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून फोन टॅपिंग प्रकरणात समन्स पाठवण्यात आले होते. जैस्वाल यांना १४ ऑक्टोबर रोजी मुंबई सायबर गुन्हे शाखेत उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. जैस्वाल यांच्याकडील फोन टॅपिंग प्रकरणातील माहिती घेण्यासाठी सायबर विभागाने समन्स बजावले होते.
मिळालेल्या माहितीनुसार सुबोध जैस्वाल यांना पहिले २ ऑग्स्ट रोजी प्रश्नावली पाठवण्यात आली होती. परंतु त्या प्रश्नावलीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स जारी केले होते. मात्र जैस्वाल चौकशीसाठी हजर राहिले नाही. यामुळे त्यांना सायबर विभागाकडून प्रश्नावली पाठवण्यात आली होती. या प्रश्नावलीला सुबोध जैस्वाल यांनी प्रतिसाद दिला आहे.
काय आहे प्रकरण
राज्यात फोन टॅपिंग प्रकरणात तयार केलेल्या अहवालामुळे एकच खळबळ माजली होती. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याद्वारे महाराष्ट्र पोलीस दलातील बदल्यांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचार प्रकरणातील अहवाल लीक झाला होता. अहवाल लिक झाला तेव्हा रश्मी शुक्ला या गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या. तसेच नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे फोन टॅप करण्यात आले तेव्हा जैस्वाल हे राज्याचे डीजीपी होते.
हेही वाचा : Bhima koregaon case : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने परमबीर सिंह, रश्मी शुक्ला यांना बजावला समन्स