पुणे | गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीएमएल बसला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.शुक्रवारी रात्री उशिरा कोथरूड बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसला अचानक आग लागली. आगीत निम्मी बस जळून खाक झाली आहे. या घटनेत जीवितहानी झालेली नाही.अग्निशमन दलाचे तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
फेर्या मारून परतल्यावर कोथरूड बस डेपोमध्ये चालकाने एम.एच-१२ एफ.सी-३३३८ या क्रमांकाची बस उभी केली. या बसने रात्री उशिरा अचानक पेट घेतला. डेपोमधील कर्मचार्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले, मात्र आग आटोक्यात येत नव्हती.अखेर या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.घटनास्थळी येऊन तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटातच आग आटोक्यात आणली. ज्या बसला आग लागली होती त्या शेजारी नादुरुस्त बस उभ्या होत्या. त्यांना त्यांना त्वरीत तेथून हटवल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोथरूड डेपोजवळ उभी केलेली पीएमपीएमएल बस पेटण्याची ही दुसरी घटना आहे. भारत बंदच्या दिवशी कोथरूड आगारासमोर रस्त्यावर उभी असलेली एक बस पहाटेच्या सुमारास पेटली होती. पीएमपीएमएलच्या बसेस जागेअभावी रात्री रस्त्यावर उभ्या केल्या जातात. वारंवार बस पेटण्याच्या प्रकारामुळे पीएमपीएमएल बसच्या देखभाल, दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद शाळा बनताहेत हायटेक
पुणे | पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भागातील प्राथमिक शाळांमध्ये मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबर कला, क्रिडा क्षेत्रात लहान मुलांच्या आवडीनुसार विविध उपक्रम राबविले जातात. खेड तालुक्यातील टाकळकरवाडी शाळेमध्ये ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या पुढाकाराने हस्ताक्षर,बेडूक उडी,बादलीत चेंडू टाकणे, फॅन्सी ड्रेस,संगीत खुर्ची,चमचा लिंबू या स्पर्धांचे आयोजन केले होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडे अनेक पालक पाठ फिरवत असतात, मात्र आता परिस्थिती बदलत चालली आहे. शहरीभागातूनही विद्यार्थी प्राथमिक शाळांशी जोडु लागले आहेत. त्यामुळे या शाळांतील शिक्षकांनाही एक वेगळा उत्साह येत आहे. त्यामुळे रोजच्या शिक्षणाबरोबर अशा स्पर्धा घेतल्या जात आहेत. त्याला विद्यार्थीसह पालकांचाही मोठा सहभाग लाभत आहे.चिमुकल्या मुलांमध्येही अनेक कला गुण असतात मात्र त्यांच्या या कलागुणांना वाव देण्याची गरज असते. त्यातूनच शिक्षणाबरोबर संस्कार अंगी बाणत असतात. विद्यार्थी घडत असतो. हाच प्रयत्न या माध्यमातुन शाळा करत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई बालमाता संगोपन केंद्र यांच्या माध्यमातून सध्याच्या वातावरणातील बदलामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टिमकडून या शाळांतील विद्यार्थांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आवश्यक औषधे मोफत देण्यात आली.
पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
पुणे| शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिरासमोर हॉटेल पर्ल येथील आर्ट गॅलरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. शिक्षक संदिप जाधव व त्यांना सहकार्य करणारे इतर शिक्षक यांनी ठाकरवाडी येथील आदिवासी मुलांवर संस्कार घडवत केवळ शैक्षणिकच दिले नाही तर समाजात वावरताना आपण कशा पद्धतीने राहिले पाहिजे हे आवर्जून सांगत त्या विद्यार्थ्यांकडून विविध यंत्र,कला वा विज्ञान विषयक इतर प्रात्यक्षिक करुन घेत या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली आहे. या त्यांच्या शिक्षणपद्धतीमुळे आज त्यांच्या काही विद्यार्थी विद्यार्थीनी नर्सिंग,संगणक प्रशिक्षक तर एक विद्यार्थिनी पोलिस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्या दिशेने वाटचाल करत आहे. या अशा अति दुर्गम भागातील छोटी मुले मुली यांच्या स्वप्नांना उंच आकाशात भरारी देण्याचे काम शिक्षक संदिप जाधव गेली पंधरा वर्ष करीत आहे. याची दखल अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्था व इतर मान्यवरांनी घेत या त्यांच्या शिक्षण गोडीचे व विद्यार्थी घडवण्याचे कौतुकही केले आहे.
बोर्डाच्या इमारतीत आत्महत्येचा प्रयत्न
पुणे | येथील दहावी बोर्डाच्या कार्यालयात एका तरुणीने जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. या प्रकारामुळे बोर्डाच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली. संबंधित तरुणीने बोर्डाच्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या स्वछतागृहात जाऊन स्वत:ला पेटवून घेतले. या प्रकाराची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
या तरुणीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत तरुणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्याने तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.संबंधित तरुणी सायंकाळच्या सुमारास कार्यालयात आली होती. तेथील एका लिपिकासोबत तिचा वाद झाला. त्यानंतर ही तरुणी स्वच्छतागृह गेली आणि अंगावर रॉकेल ओतून तिने स्वतःला जाळून घेतले, मात्र पेटल्यानंतर तिने जोरात आरडाओरडा केला. तिच्या किंकाळ्या एकूण कार्यालयातील कर्मचार्यांनी स्वच्छतागृहाकडे धाव घेतली. त्यावेळी ही तरुणी आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली होती. कर्मचार्यांनी तातडीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती ५० टक्के पेक्षा जास्त भाजली आहे. त्या तरुणीचे येथील लिपिकाशी प्रेमसंबंध होते, यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.