सीआयएसएफचे कमांडो नसते तर खार पोलीस ठाण्याबाहेर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची हत्या झाली असती असे वक्तव्य भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे खोटी एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी मागणी केली असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, आम्ही राज्यपालांना भेटलो सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव आणण्यात येत आहे. जो काही दहशतवाद राज्यात सुरु आहे. पोलिसांच्या मार्फत केला जातो आहे. त्याबाबत राज्यपालांना माहिती दिली आहे. किरीट सोमय्यांनी घटनाक्रम सांगितला असून त्यामध्ये त्यांची कोणतीही चूक नाही. जो एफआयआर दाखवण्यात आला तो खोटा होता. त्याचाही निषेध राज्यपालांसमोर व्यक्त केला असून तो एफआयआर रद्द करण्यात यावा आणि नवीन एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
दबावामुळे महाडेश्वरांना अटक
सोमय्यांच्या गाडीवर हल्ला झाला. ६० ते ७० लोकांच्या जमावाने हल्ला केला आणि किरीट सोमय्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ५० ते ६० लोकं उपस्थित होते असे दिसत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची अपेक्षा होती परंतु नंतर दबाव आल्यामुळे नावापुरते महाडेश्वर यांना अटक करुन सोडण्यात आले.
अधिकाऱ्यांचे दबावाखाली काम हे लोकशाहीसाठी घातक
किरीट सोमय्यांनी पोलीस ठाण्यात मी येत असल्याचे कळवले होते. त्याच्यामुळे ते अचानक गेले नव्हते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याची पोलिसांची जबाबदारी होती परंतु सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत होते. या सगळ्या गोष्टी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सुरु होत्या असे सोमय्यांनी पाहिले आहे. डीसीपी आणि वरिष्ठ अधिकारी दबावाखाली काम करत होते. या सगळ्या गोष्टी लोकशाहीला घातक आहेत. संविधानाने या सगळ्या यंत्रणा निष्पक्षपातीपणासाठी ठेवल्या आहेत. किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा व्यवस्था आहे. त्यांच्यावर जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य माणसांनी बघायेच कुठे? असे दरेकर म्हणाले आहेत.
गृहमंत्र्यांकडे गेलो असतो परंतु….
सीआयएसएफ काय करत होते. त्यांची अपेक्षा होती का, सीआयएसएफने गोळीबार करावा आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचे सीआयएसएफबरोबर तुंबळ युद्ध व्हावे, एका जबाबदार आयुक्तांनी अशाप्रकारे वक्तव्य करणं योग्य नव्हते. इथल्या पोलिसांची जबाबदारी असते केवळ सीआयएसएफ होते म्हणून किरीट सोमय्यांचा जीव वाचला आहे. हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. आम्ही गृहमंत्र्यांकडे गेलो असतो, गृहसचिवांकडे गेलो असतो परंतु न्याय मिळेल असे वाटत नाही. किरीट सोमय्या यांचे घोटाळे, भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, त्यामुळं सोमय्या यांनाच नष्ट करावं अशा प्रकारचा डाव या सरकारचा आहे.
हेही वाचा : हल्ल्या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, राज्यपालांनी आश्वासन दिल्याचे सोमय्यांचे वक्तव्य