नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मंगळवारी (ता. 19 मार्च) केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचा तपशील अजून समोर आलेला नाही. मनसे लवकरच भाजपासोबत युती करुन महायुतीचा भाग होईल अशी शक्यता आहे. यासाठीच भाजपा नेत्यांनी राज यांना दिल्ली दरबारी बोलावले होते, अशी माहिती आहे. राज ठाकरेंनी या भेटीवर मला या म्हटले, म्हणून मी आलो. एवढीच प्रतिक्रिया दिली आहे. मनसे आणि भाजपा युतीची घोषणा मुंबईत होण्याची शक्यता आहे.
या फोटोला काय कॅप्शन सुचवाल? #MNS #RajThackeray #AmitShah pic.twitter.com/lsn6PpYJLW
— My Mahanagar (@mymahanagar) March 19, 2024
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल रात्रीच दिल्लीत दाखल झाले होते. ज्यानंतर मनसेला एनडीएचा घटकपक्ष करण्याच्या हालचाली वाढल्या. आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यामध्ये साधारणतः अर्धा तास चर्चा झाली. राज ठाकरे दिल्लीतील ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तिथे त्यांना घेण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पोहोचले होते. त्यानंतर विनोद तावडे हे राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासोबत अमित शहा यांच्या दिशेने 12.15 वाजताच्या सुमारास रवाना झाले.
या भेटीमध्ये जागा वाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा करण्यात आली. या भेटीचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर, या भेटीत नेमकी काय चर्चा करण्यात आली. याबाबतचा कोणताही तपशील समोर आलेला नाही. ज्यामुळे मुंबईत येऊनच राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, या भेटीमुळे राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आज केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांच्याशी दिल्लीत भेट झाली. pic.twitter.com/8XMIEXydYq
— Raj Thackeray (@RajThackeray) March 19, 2024
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या 18 वर्षांपासून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आहे. मात्र, तरी देखील त्यांची सत्ता येऊ शकली नाही. ज्यामुळे आता कमीत कमी युतीत सहभागी होऊन सत्तेत जाता येते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज ठाकरे यांची ताकद मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांना मुंबईतील जागा सोडल्या जाऊ शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, त्यातही दक्षिण मुंबईची जागा ही बाळा नांदगावकर यांना देणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. ज्यामुळे मुंबई दक्षिण मुंबई लोकसभेत ठाकरे वि. ठाकरे अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.