राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा राजकीय हेतूने वापर करण्यात येत आहे. नेत्यांविरोधात कारवाई करुन यंत्रणांचा वापर करुन दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्राकडून करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. त्यांना बोलण्याचा त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली पाहिजे. त्यानुसार योग्य कारवाई होईल असे रोहित पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, जर तुम्ही या सगळ्या गोष्टी बघितल्या तर कुठेतरी केंद्रीय यंत्रणांचा वापर सत्तेत असणाऱ्या लोकांच्या विरोधात आणि लोकांमध्ये त्यांच्याविरोधात एक वेगळं वातावरण तयार व्हावे, दबावतंत्राचा वापर करण्यात यावा या हेतूनं सगळ्या गोष्टी होत असल्याचे समोर दिसत आहे. जेव्हा एखादा भाजपचा नेता म्हणतो की, विरोधी पक्षात असणारा एखादा नेता माझ्या खिशात आहे. मग कदाचित ईडी त्यांच्या खिशात असेल. परंतु नांदेडच्या पोटनिवडणुकीतील कौल बघितले तर लोकशाही त्यांच्या खिशात नाही हे दिसून येत आहे. ईडी त्यांच्या खिशात असल्या तरी लोकशाहीवर हा देश चालतो त्यामुळे आमचा लोकशाहीवर विश्वास असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुखांना संधी द्यावी
रोहित पवार म्हणाले की, अनिल देशमुख स्वतःहून ईडीच्या कार्यालयात गेले, चौकशी झाली मग रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आलं आहे. त्यांना बोलण्याची संधी दिली नसेल तर ते चुकीचे आहे. मत मांडण्याची संधी दिली पाहिजे. त्यांचे ऐकून घेतले पाहिजे यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
आयकरच्या धाडीवर अजित पवार बोलेत
आयकर विभागाची नोटीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आली आहे. यावर रोहित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रोहित पवार म्हणाले, एकतर प्रॉपर्टी कोणाची कोण बघते हे कळेलच हा आकडा कसा काढला जातो. स्वतः अजित पवारांनी आयटीवर मत व्यक्त केलं आहे. आयटी कोणावरही होऊ शकते असे अजित पवारांनी सांगितले आहे. याबाबतच्या योग्य गोष्टी लवरकरच समोर येतील असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा : अजित पवारांशी संबंधित ४ मालमत्ता जप्त, किरीट सोमय्यांचे ट्विट, मार्केट व्हॅल्यू काय?