घरमहाराष्ट्रगिरीश कुबेरांवर शाईफेक, संभाजी महाराजांवरील पुस्तकाचा वाद नेमका काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही केला...

गिरीश कुबेरांवर शाईफेक, संभाजी महाराजांवरील पुस्तकाचा वाद नेमका काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही केला होता विरोध

Subscribe

नाशिक इथे सुरू असलेल्या साहित्य संमेलनात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या दोन कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली आहे. गिरीश कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजीराजेंचा अपमान केला आहे असं शाईफेक करणाऱ्यांचं म्हणणं होतं. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नितीन रोटे पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गिरीश कुबेरांवर शाईफेक केल्याला दुजोरा दिला. परंतु ज्या कारणासाठी शाई फेकण्यात आली तो वाद नेमका काय आहे?

गिरीश कुबेर यांनी ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्राची जडण-घडण उलगडून दाखवताना त्यांनी ‘डेक्कन आफ्टर शिवाजी’ या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय झालं, याची मांडणी केली होती. या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांची हत्या शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनीच केल्याचं म्हटंल आहे, असा आरोप आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या पुस्तकातील लिखाणाचा विरोध केला होता. “अमोल कोल्हे यांनी ट्विट करून आणि कुबेर यांना पत्रं लिहून पुस्तकातील वादग्रस्त मजकूर वगळण्याची मागणी केली होती. कुबेर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra” या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा आक्षेपार्ह मजकूर समाज माध्यमांद्वारे माझ्या वाचनात आला. मी अद्याप हे संपूर्ण पुस्तक वाचले नाही. तथापि या पुस्तकातील काही पाने माझ्या वाचण्यात आली आहेत. त्यामध्ये नमूद उल्लेख काळजीपूर्वक वाचला. कुबेर यांचा अर्थकारण, परराष्ट्रधोरण, विशेषतः रशियाचे राजकारण यासंबंधीचा व्यासंग पाहता त्यांनी यासंदर्भात केलेले हे उल्लेख वाचून सखेद आश्चर्य वाटले. कुणा परदेशी लेखकाची ऐकीव माहिती किंवा मुघल इतिहासकारांनी केलेल्या उल्लेखांवर आधारित ऐतिहासिक लिखाण करणे, एकांगी व तथ्यहीन असेल ही बाब कदाचित कुबेर यांच्या लक्षात आली नसावी,” असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं होतं.

“छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्या कारभाऱ्यांना हत्तीच्या पायी दिल्यानंतर देखील महाराणी सोयराबाई जिवंत होत्या. हे दाखवणारी अनेक साधने व पुरावे उपलब्ध आहेत. तीच बाब बुऱ्हाणपूर मोहिमेसंदर्भात आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील “स्वराज्यरक्षक संभाजी” मालिका करताना मी हे पदोपदी अनुभवले आहे. त्याचप्रमाणे अशा विधानांचा आधार घेऊन भविष्यात पुन्हा बदनामीचे षडयंत्र रचले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून माझी संबंधित लेखक व प्रकाशकांना विनंती आहे की, शिवशंभू प्रेमींच्या भावनांचा आदर करून आणि सत्याची कास धरून सदर आक्षेपार्ह विधाने वगळण्यात यावीत. लेखकाच्या लेखन स्वातंत्र्याविषयी जो आदर आहे, त्यास तडा जाऊ देऊ नये ही विनंती,” असं खासदार कोल्हे यांनी पत्राद्वारे म्हटलं होतं.

- Advertisement -

कुबेरांना काय साध्य करायचं आहे? – मिटकरी

कुबेर यांच्या पुस्तकावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सडकून टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची बाजीराव पेशव्यांसोबत तुलना करून कुबेराना नेमकं काय साध्य करायचं आहे? पुस्तकावर आक्षेप आले की प्रसिद्धी व खपाची विक्री वाढून अमाप पैसा मिळतो. लेखकांचा हाच उद्देश असेल तर हे गंभीर आहे. या पुस्तकाची शहानिशा करून कार्यवाही व्हावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली होती.

भाजपचा पण पुस्तकाला विरोध

पुस्तकात बदनामीकारक मजकूर छापल्या प्रकरणी कुबेर यांनी देशाची माफी मागावी. तसेच या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -