सांगलीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. भीषण आगीमध्ये शेतमजुरांची २४ घरं जळून खाक झाली आहेत. सांगलीच्या वाळवा याठिकाणी ही घटना घडली आहे. या भीषण आगीत अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र या आगीत सुमारे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले असल्याचे सांगितेल जात आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
अशी घडली घटना
सांगली जिल्ह्यातल्या वाळवा येथील बाराबिगा वसाहतीत आज भीषण आग लागली. या आगीमध्ये २४ पत्रावजा घरं जळून खाक झाली. सकाळी १० वाजता बाराबिगा वसाहतीत राहणाऱ्या गंगूबाई प्रकाशे यांच्या घरी आग लागली. यादरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. ही आग पसरली आणि या आगीमध्ये आसपासच्या एकूण ५ जणांच्या घरामध्ये गॅस सिलेंडरचा एकापाठोपाठ स्फोट झाला. ५ सिलेंडरच्या स्फोटामुळे या आगीने रौद्र रूप धारण केले. आगीमध्ये जवळपास २४ घरं जळून खाक झाली. आग लागलेल्या घरातील सदस्य शेतमजुरी करत असल्याने आगीच्या वेळी घरात कोणीच नव्हते. त्यामुळे सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.
आगीत ३० ते ३५ लाखांचे नुकसान
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या अग्नीतांडवात संसार उपयोगी साहित्य, सोन्याचे दागिने, रोख रक्कम जळून खाक झाले. या भीषण आगीत सुमारे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. तर घटनेनंतर हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्याकडून सर्व कुटुंबामध्ये ५ हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे. तर तहसिल रविंद्र सबनीस यांनी घटना स्थळी भेट देऊन लवकरात लवकर शासकीय मदत करू असे आश्वासन दिले आहे.