मुंबई : सप्टेंबर महिन्यापासूनच देशात सणासुदींचे दिवस सुरू होतात. अगदी काही दिवसांच्या अंतराने गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी, गोपाळकाला, रक्षाबंधन तसेच अनेक सण येतात. यावेळी लोकांची बाजारात विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते. सध्या राज्यासह देशात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. तर उद्या (ता. 24 ऑक्टोबर) दसरा झाल्यानंतर या वर्षाचा शेवटचा आणि महत्त्वाचा सण असलेल्या दिवाळीची तयारी करण्यासाठी लोकांची लगबग सुरू होईल. पण या सर्वावर आता महागाईचे संकट घोंघावत आहे. कारण, लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याने सामन्या नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. भाज्यांची आवक कमी झाल्याने राज्यातील प्रमुख मार्केट्समध्ये भाजीपाल्यांचे दर वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. (Scissors to the common man’s pocket, increase in the price of vegetables before Diwali)
हेही वाचा – महामार्गावर खैराची तस्करी करणार्यांवर वनविभागाची कारवाई
ऐन सणासुदीतच सामान्य माणसाला घाम फोडणारी बातमी समोप आली असून पुणे, नाशिक, मुंबई, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील मार्केटमध्ये फळांसह पालेभाज्यांच्या दरात वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर दिवसांपेक्षा नवरात्री उत्सवामध्ये भाज्यांची मागणी मोठी असते. परंतु, आता बाजारात भाज्यांची आवकच कमी असल्याने दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यातही प्रामुख्याने शेवगा, गाजर, बीट, कांदा, हिरवी आणि मिरचीच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, पुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरात तब्बल 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. ज्यामुळे अवघ्या पाव किलो भाजीसाठी लोकांना 20 ते 25 रुपये मोजावे लागत आहेत.
त्याशिवाय, काकडी, मेथी, शेवगा, गाजर, बीट, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, फ्लॉवर, ढोबळी मिरची, बीट आणि पालेभाज्यांच्या दरांमध्ये 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे आता ऐन सणासुदीत सामन्यांना भाजीपाल्यांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे लोकांकडून दिवाळीची तयारी करण्यात येत आहे. कपडे, किराणा आणि अन्य साहित्यांची खरेदी करण्यासाठी लोक बाजारांमध्ये गर्दी करू लागले आहेत. आधीच विविध गोष्टींमध्ये भाववाढ झाल्यानंतर आता फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात झालेल्या वाढीमुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे.