नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या शुभांगी पाटील ( ठाकरे गट) यांचा पराभव झाला. या पराभवानंतर शुभांगी पाटील यांनी शिवसेनेतचं राहणार असून झाशीच्या राणीसारखं लढणार असं ठामपणे सांगितलं आहे. त्या काल नाशिकमध्ये बोलत होत्या. शुभांगी पाटील म्हणाल्या की, 40 हजार मतं पडणं हे एका सामान्य घरातील लेकीला फार विशेष आहे. झाशीची राणी लढली, तसं मला लढायचं आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही. दरम्यान नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे विजयी झाले. या निकालामुळे गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना ब्रेक लागला आहे.
शुभांगी पाटील म्हणाल्या की, 40 हजार मतं पडणं एका सामान्य घरातील लेकीला फार विशेष आहे. माझ्या घरात कधी कोणी सरपंच झालं नाही. पण पाच जिल्ह्यातून 40 हजार मतं मिळात असतील तर जनतेचे आभार आहेत. मी शिवसैनिकांचेही आभार मानते. महाविकास आघाडीचेही आभार मानते. झाशीची राणी लढली तसं मला लढायचं आहे. या निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेचा, विनाअनुदानित शिक्षकांचा, लढणाऱ्या शिक्षकांचा पराभव झाला, ज्यांनी 15 वर्षे म्हणजे तीन टर्म काय हे सगळ्यांना माहित आहे. आता वारशाने काय करणार याकडे तुमच्यासह माझे डोळे लागले आहेत. माझ्या मावळ्यांना, भाऊ आणि बहिनींनासोबत घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. मी शिवसेना कधीच सोडणार नाही. शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकचं राहणार.
दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे भरघोस मतांनी विजयी झाले, त्यांना अंतिम फेरीत 68 हजार 999 मतं मिळाली, तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली आहेत. या अटीतटीच्या लढाईत सत्यजीत तांबे 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. गेल्या महिन्याभरापासून नाशिक पदवीधर निवडणुकीवरून राजकारण रंगले मात्र अखेर सत्यजीत तांबे यांनी सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला.