घरमहाराष्ट्रमराठवाडाAbhijit Patil : सध्या कर्ज फेडणे अशक्य, पण...; कारखान्याच्या कारवाईवर अभिजित पाटलांकडून...

Abhijit Patil : सध्या कर्ज फेडणे अशक्य, पण…; कारखान्याच्या कारवाईवर अभिजित पाटलांकडून भाष्य

Subscribe

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कारवाईवर अभिजित पाटील यांनी भाष्य केलं आहे. 

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूरचे नेते अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगर-गुरसाळे, (ता. पंढरपूर, जि.सोलापूर) कारखान्याच्या 3 गोडाऊनला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी आज सील केले आहे. थकीत कर्जाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर आता अभिजित पाटील यांनी या कारवाईप्रकरणी भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितले की, 125 कोटी रुपये तातडीने भरणे अशक्य आहे, पण यातून लवकरच तोडगा काढून शेतकऱ्यांचे व कामगारांचे पैसे दिले जातील. (Shri Vitthal Cooperative Sugar Factory Abhijit Patil)

अभिजित पाटील म्हणाले की, न्यायालयात केस चालू होती, काल स्टे उठला होता आणि आज सकाळी अधिकाऱ्यांनी गोडाऊन सील केले आहे. गोडाऊनमध्ये 1 लाख पोती साखर शिल्लक आहे. गोडाऊनमधील साखर विकून शेतकऱ्यांना पैसे द्यायचे होते. मात्र, काही झाले तरी यातून लवकरच तोडगा काढून शेतकऱ्यांचे व कामगारांचे पैसे देण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सर्व कर्ज पूर्वीच्या बोर्डावरील मंडळींनी केलेले असून त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु बँकेने कर्जाच्या 25 टक्के म्हणजे जवळपास 125 कोटी रुपये तातडीने भरण्यास सांगितले आहेत. सध्या हे पैसे भरणे अशक्य असून टप्प्या टप्प्याने पैसे भरणार असल्याचा प्लॅन देखील बँकेला दिला होता. मात्र, बँकेने अचानक कारवाई केली, असे अभिजित पाटील यांनी म्हटले.

- Advertisement -

 हेही वाचा – Lok Sabha 2024: कितीही रडीचे डाव खेळा, आमचीच राष्ट्रवादी जनतेतून दणकून येणार; कोल्हेंनी दादांना डिवचले

काय आहे प्रकरण? (What is the matter?)

दरम्यान, पंढरपूरमधील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर दोन वर्षांपूर्वी पूर्वीचे सत्ताधारी भगीरथ भालके यांचा पराभव करून अभिजित पाटील यांनी हा कारखाना जिंकला होता. पहिल्या वर्षी 7 लाख 80 हजार, तर दुसऱ्या वर्षी 10 लाख 85 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून अभिजित पाटील यांनी बँकेचे जवळपास 35 कोटी रुपये फेडले होते. परंतु काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा शिखर बँकेने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाईचा बडगा उचलल्यावर अभिजित पाटील यांनी न्यायालयातून कालपर्यंतची स्थगिती आदेश मिळवला होता. मात्र, आज सकाळीच शिखर बँकेची टीम पोलिसांसह कारखानाच्या ठिकाणी कारवाईसाठी दाखल झाली.

- Advertisement -

बँकेच्या नोटीसीमध्ये काय? (What about the bank notice?)

गोडाऊनवर लावण्यात आलेल्या सीलमध्ये म्हटले आहे की, वेणूनगर-गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., ची चल मालमत्तेचा (साखरसाठा) ताबा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई यांच्या मार्फत प्राधिकृत अधिकारी कैलास नामदेव घनवट, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी सेक्युरिटायझेशन कायदा 2002, कलम 13 (4) अन्वये तसेच डी. आर.टी कोर्ट, पुणे दावा क्र.एस.ए.62/2024 मध्ये 25 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सुनावणी मध्ये न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या, सरफेसी कायद्यान्वये कारखान्याच्या मालमत्ता जप्ती अनुषंगाने दिलेला स्टे उठविल्यानुसार व पुरक नियमाप्रमाणे 26 एप्रिल 2024 रोजी ताबा घेतला आहे. त्यामुळे सर्व कर्जदार आणि सामान्य जनतेस सूचित करण्यात येते की, सदर उपरोक्त कारखान्याच्या चल मालमत्तेचा कोणाशीही कुठल्याही प्रकारचा हस्तांतर/तबलीचा/ विक्रीचा व्यवहार करू नये, अशा प्रकारचे व्यवहार केल्यास ते बेकायदेशीर ठरतील यांची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – Maharashtra politics : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीबद्दल रोहित पवार म्हणतात, सत्ता आल्यावर…

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -