राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडताना भाजप खासदार प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे अपघाताने मुख्यमंत्री झाले आहेत. तसंच, हे महाविकास आघाडी सरकार नाही तर महाविश्वास घातकी आघाडी सरकार आहे, अशी टीका जावडेकर यांनी केली.
प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. प्रकाश जावडेकर यांनी उद्धव ठाकरेंना अपघातानं झालेले मुख्यमंत्री म्हणत टीकास्त्र सोडलं. तसंच, राज्य सरकारला २ वर्ष पूर्ण झाली, पण केंद्राने केलेली कामेही त्यांनी आपल्या खात्यात मांडली असा आरोप देखील जावडेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
तसंच, पुढे बोलताना महाविकास आघाडी सरकारचं जावडेकर यांनी नामकरण केलं. महा विश्वासघातकी आघाडी सरकार असं मी नवं नाव या सरकारला देत आहे, असं जावडेकर म्हणाले. अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले, काही मंत्र्यांनी जावयाला कंत्राट दिलं, काही मंत्र्यांनी दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली, अशी टीका जावडेकर यांनी मंत्र्यांची नावं न घेता केली. तसंच, राज्यात भ्रष्टाचार आहे, कायदा सुव्यवस्था नाही. गृहमंत्री ६ महिने फरार होते, आणि आता जेलमध्ये ते गेले, असं कोणतं राज्य आहे? असा सवाल जावडेकर यांनी केला.