लोकसभा २०१९ च्या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज, १८ एप्रिल रोजी पार पडले. देशभरात झालेल्या मतदानात महाराष्ट्रातील १० मतदार संघाचाही समावेश होता. राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या मतदार संघात आज मतदान झाले. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात राज्यातील १० मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५७.२२ टक्के मतदान झाल्याचे समजते. तर दिवसाअखेरीस संपूर्ण राज्यात ६१.२२ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे.
#लोकसभानिवडणूक । दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५७.२२ टक्के #मतदान #2ndPhaseVoting pic.twitter.com/pCU0tf0AUE
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 18, 2019
सर्वाधिक मतदान नांदेडमध्ये
दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे आणि नवनीत कौर यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. या दहा मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदान हे नांदेड जिल्ह्यात झाले असून येथे ५ वाजेपर्यंत ६०.८८ टक्के मतदानाची नोंद आहे. तर सर्वात कमी सोलापूर जिल्ह्यातील ५१.९८ टक्के मतदानाची नोंद आहे. तर ६० टक्क्यांचा आकडा गाठलेला नांदेड आणि हिंगोली हे दोनच मतदार संघ आहेत.
Here is the voters population of 10 #Loksabha constituencies in #Maharashtra and voting percentage of 2014 #LokSabhaElections .#LoksabhaElections2019 #MahaLokSabha2019 pic.twitter.com/jeGSjSmZhw
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) April 18, 2019
२०१४ ला बीडमध्ये सर्वाधिक मतदान
लोकसभा २०१४ ची आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक मतदान हे बीड मतदार संघात झाल्याचे पाहायला मिळते. या मतदार संघात ६८.७५ टक्के मतदान झाले होते. तर यावेळी मतदानाचा टक्का घसरून थेट ५८.४४ वर आला आहे. शिवाय यंदा सर्वाधिक मतदान झालेल्या नांदेडमध्ये २०१४ ला ६०.११ टक्के मतदान झाले होते. यंदा प्रथमच लोकसभेला ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला होता. शिवाय मतदारांना नोटाचा पर्याय देखील उपलब्ध होता. मात्र २०१४ च्या तुलनेत यंदा झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिल्यास मतदार राजाने निवडणुकांकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसले.