घरमहाराष्ट्रनेरळमध्ये पाणीच पाणी चहूकडे..

नेरळमध्ये पाणीच पाणी चहूकडे..

Subscribe

रस्ता झाला ओढा, घरांमध्ये शिरले पाणी

कर्जत-कल्याण राज्यमार्गाला अनेक ठिकाणी अनधिकृत कामांचा विळखा पडला असून, त्याचा फटका पावसाळ्यात अनेकांना बसत आहे. राज्यमार्गावरील येथील एका खासगी शाळेच्या बांधकामामुळे पाणी अडल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच अनेक नागरिकांच्या घरातही पाणी घुसल्याचे समोर आले आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू असून, याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच शहरात व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने हे पाणी रस्त्यावर, तसेच नागरिकांच्या घरात आले आहे. अशीच परिस्थिती रेल्वे स्टेशन परिसर, श्री साई मंदिर, निर्माण नगरी भागात पहायला मिळत आहे. या संदर्भात तक्रारी करूनही अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

- Advertisement -

गेल्या आठवडाभरापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच नेरळ, धोमोते भागात विकासकांनी केलेल्या अनाधिकृत बांधकामांमुळे नैसर्गिक नाले बुजवून टाकण्यात आल्याने हे पाणी आता महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या शाळेच्या बांधकामांमुळे हा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. शार्विल नामक ही शाळा अगदी महामार्गाला लागून आणि अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीजवळ असल्याने बांधकामामुळे ही शाळा चर्चेचा विषय बनली आहे.

बिल्डरांबरोबर रेल्वेनेसुद्धा हातपाय पसरल्याचे समोर येत आहेत. गेल्यावर्षी तक्रारी करूनही ग्रामपंचायत आणि रेल्वेने कोणतीही उपाययोजना न केल्याने यावर्षीदेखील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामांचा विळखा आणि ग्रामपंचायती बरोबरच रेल्वेचे दुर्लक्ष यामुळे आता दाद तरी कोणाकडे मागावी, असा नेरळकरांसमोर प्रश्न आहे. बांधकाम विभाग, ग्रामपंचायत यांनी वेळीच लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -