मुंबई : जुन अखेर ते जुलैच्या मध्यात आणि अखेरीस महाराष्ट्रात धो-धो बरसलेल्या पावसामुळे कुठे दरडी कोसळल्या तरी कुठे महापूर आले. यामध्ये नुसते झाले ते फक्त नुकसान. मात्र, त्यानंतर दडी मारलेला पाऊस पुन्हा परतत नसल्याने राज्यातील बळीराजा पुन्हा एकदा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, आज 14 ऑगस्टपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती बघितली असता या प्रकल्पातील जलसाठा हा केवळ 61 टक्क्यांवर असून, मागील वर्षी तो याच तारखेला 79 टक्के होता. तेव्हा यंदा मागील वर्षीच्या तुलनेत अद्याही प्रकल्पात 18 टक्के एवढी तूट असल्याचे दिसून येत आहे.(Water Storage Even if it rains, the project in the state remains at 60 percent; 18 percent deficit compared to last year)
साधारणता जुन महिन्यापासून पावसाला सुरूवात होते. मात्र, यावर्षी ऐन मान्सून राज्यात दाखल होण्याच्या वेळेतच अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय वादळामुळे राज्यात मान्सून जरा उशिरानेच दाखल झाला. यामुळे पेरण्याही खोळंबल्या होत्या. मात्र, जुनच्या अखेरीस सक्रिय झालेल्या पावसाने जुलैच्या अखेरापर्यंत राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे राज्यातील प्रकल्प तुडूंब भरून उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटेल असे वाटत असतानाच आज 14 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठ्यात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 18 टक्के तूट असल्याचे दिसून आले आहे. कारण, सध्या राज्यातील मोठे, मध्यम आणि लघू अशा एकुण 2 हजार 994 प्रकल्पामध्ये सध्या 61.16 टक्के जलसाठा असून, तो मागील वर्षी याच तारखेला तब्बल 79.63 टक्के एवढा होता. त्यामुळे धो-धो बरसलेल्या पावसानंतरही राज्यातील प्रकल्प ‘साठी’च गाठू शकल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : तुम्ही दिलेल्या केंद्रावरच जातो पण प्रवास खर्च द्या; वाचा कोणत्या परीक्षार्थ्यांनी केली अशी मागणी
आता उरला फक्त दीड महिना
पावसाळ्याच्या चार महिन्यांतील अडीच महिने उलटून गेले आहेत. आधीच उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यात पेरण्या उशिराने झाल्या होत्या. त्यानंतर बरसलेल्या पावसामुळे राज्यातील प्रकल्प तुडूंब भरतील असे वाटत असताना तसे झाले नाही. मात्र, यासर्वामध्ये उलटून गेले ते अडीच महिने. आता पावसाळ्याचा दीड महिना उरला असून, आता किती टक्के पाऊस पडतो आणि किती टक्के जलसाठा प्रकल्पामध्ये साठवल्या जातो हे येणारा काळच ठरवणार आहे.
हेही वाचा : शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर रोहित पवार थेटच बोलले; काय म्हणाले वाचा-
अशी आहे राज्यातील प्रकल्पांची स्थिती
विभाग प्रकल्प सद्यस्थितीत मागील वर्षी
नागपूर 383 69.44 टक्के 76.41 टक्के
अमरावती 261 63.98 टक्के 84.06 टक्के
औरंगाबाद 920 31.70 टक्के 72.35 टक्के
नाशिक 537 56.48 टक्के 72.23 टक्के
पुणे 720 67.99 टक्के 84.58 टक्के
कोकण 173 85.24 टक्के 84.95 टक्के
एकुण 2994 61.16 टक्के 79.63 टक्के
औरंगाबाद विभागाची स्थिती गंभीर
राज्यातील सहा विभागात एकुण 2 हजार 994 एवढे मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्प आहेत. यामध्ये औरंगाबात विभागात सर्वाधिक 920 प्रकल्प असून, यंदा मात्र, या प्रकल्पामध्ये केवळ 31.70 टक्के एवढाच जलसाठा असल्याची स्थिती असून, मागील वर्षी ती 72.35 टक्के एवढी होती. त्यामुळे आता जर पुढील दिवसांत पाऊस न बरसल्यावर मराठवाड्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता आहे.