महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल दिसून येत आहेत. यामुळे देशात अवकाळी पावसाची चिंता व्यक्त होतेय. उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे उत्तराखंड, दिल्ली, जम्मू-काश्मीरसह हिमाचल प्रदेशमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र मुंबईसह महाराष्ट्रात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. काही जिल्ह्यांत तापमानाचा पारा 35 अंशांवर पोहचला आहे. मात्र 7 ते 10 मार्चदरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 8 ते 10 मार्चला पावसाची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे. तपर कोकणातही यामुळे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
दिल्लीतही हवामानात मोठे बदल होत आहेत. मध्यम स्वरूपाचे वारे वाहत असल्याने दिल्लीत संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज दिल्लीत ढगाळ वातावरण राहणास रिमझिम पावसाची शक्यता आहे. यामुळे कमाल तापमान 29 अंश तर किमान तापमान 16 अंश राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान राजस्थानमध्येही हवामानात मोठे बदल होत आहेत. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 7 ते 9 मार्चपर्यंत आकाश निरभ्र राहणार असून अधूनमधून पावसाची रिमझिम सुरु राहील, यामुळे बहुतांश राज्यात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत राहिल. पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश राज्यातही ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे.